
इज एव्हरीथींग रियली वेल
पुस्तकातल्या घोकमपट्टीपेक्षा वर्तमानात अंगी असलेल्या कलागुणांना अनन्यसाधारण महत्व द्या, हा संदेश देणारा चित्रपट गेल्या दशकभरापूर्वी आपल्याकडे येऊन गेला. आणि त्या त्या चित्रपटातून रँचो ‘रणछोडदास’ ते फुंगसुक वांगडू या काल्पनिक नावाच्या कथानकाला अवघ्या देशातील तरुणांनी डोक्यावर घेतले. परंतु थ्री इडियट्स या चित्रपटातील फुंगसूक वांगडू हे कोण आहेत? हे अवघ्या जगाला माहित होते. दुर्दैव अर्ध्या भारताला माहित नव्हते. ते केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या हुकुमांनी अर्ध्या भारताला फुंगसूक वांगडू कोण ? हे जेव्हा दाखवून दिले तेव्हा अखंड भारत सोनम वांगचूक यांना केलेल्या अटकेचा निषेध करत राहिले. आता हे सोनम वांगचूक कोण? हे आहेत लड्डाखमधले पर्यावरण प्रेमी, शिक्षणप्रेमी, विज्ञानप्रेमी, बुद्धीजीवी. ज्यांना की आजपर्यंत कित्येक पुरस्कार मिळाले. त्यात सर्वोच्च मानला जाणारा रॅमन मॅगेसेसे (शांततेचा पुरस्कार) पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचूक यांनी लड्डाखमधल्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन सुरू केले. ते अहिेंसेच्या मार्गाने उपोषण करत असताना केंद्र सरकारने मात्र त्यांना देशद्रोही ठरवले. सोनम वांगचूक यांना अटक झाली. ते पाकिस्तानचे हस्तक असल्याचे आरोप त्यांच्यावर माध्यमातून अथवा सोशल मिडियातून केले जातात. परंतु लिखित स्वरुपात असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला नसल्याचे सांगण्यात येते. दुर्दैव याचं वाटतं… ज्या व्यक्तीने या देशाची ओळख उभ्या जगाला आपल्या कर्तृत्व-कर्मातून करून दिली. जो व्यक्ती आपल्या कर्तृत्व-कर्मामुळे सर्वदूर सुपरिचीत आहे या 2024 ते आजपर्यंतच्या कालखंडात भारतीय जनता पार्टीने ज्या सोनम वांगचूक यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत केले, त्यांच्या संस्थेसाठी जागा दिली, भाजप सरकारच्या कालखंडातच देशाबहेर जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा दिले त्या वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. तेव्हा वांगचूक झुकले नाही ना त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो हताश झाल्या. त्यांनी वांगचूक यांच्या अटकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. गितांजलींची
हेबियस कॉर्पस
भारतीय संविधानाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यासाठी, न्यायासाठी आणि हक्कासाठी तुम्हा-आम्हाला काय काय दिले हे आपल्याला माहितच नाही. आपण केवळ फेसबुक, व्हॉटस्अॅपच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यात आणि शेंगा हाणण्यात पटाईत असल्याचे अनेकदा जाणवते हेबियस कॉर्पस म्हणजे न्यायालयातला हा सर्वात महत्वाचा दरवाजा म्हणावा लागेल. हा दरवाजा ठोठावल्यानंतर जे काही प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर सरकारला आणि व्यवस्थेला द्यावच लागतं. म्हणूनच गितांजली अंग्मो यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कोणत्या कलमाखाली सोनम यांना अटक केली? अशी याचिका जशी न्यायालयाकडे दाखल केली तसे त्यांनी राष्ट्रपतींनाही याबाबत पत्र लिहिले. यावर सरकारकडून अटक योग्य असल्याचे सांगण्यासाठी जे सरकारचे
तोंडी दावे
केले जात आहेत, त्यात मुख्य म्हणजे लडाखमधील हिंसाचाराकडे वांगचुक यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप. मात्र ‘रासुका’ किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यासाठी देशविरोधी कारवायांत प्रत्यक्ष सहभाग दिसणे आवश्यक असते. सरकारच्या तोंडी प्रचारानुसार, वांगचुक यांनी केलेल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांना चिथावणी मिळाली, ‘अरब स्प्रिंग’चे उदाहरण दिले, ‘स्वत:ला पेटवून घ्या’ अशी उद्बोधक भाषा वापरली – असे आरोप करण्यात येत आहेत. मात्र, हे सारे आरोप कागदोपत्री असून, कागद कुणाला दिसलेले नाहीत. या अटकेनंतर वांगचुक यांच्या संस्थेचा परदेशांतून निधी मिळवण्याचा परवाना सरकारने रद्द केला, तसेच संस्थेला दिलेली जमीनही सरकारी यंत्रणेकडून परत घेतली गेली. हे नियमभंग अटक होईपर्यंत सरकारी यंत्रणांना दिसलेच नव्हते. वास्तविक, देशातील कायद्याची प्रक्रिया पाळली न गेल्याचा आक्षेप अत्यंत गंभीर आहे. घोटाळ्यांच्या आरोपांतून मुक्त होण्यासाठी वस्तुपाठ सरकारकडून आखला जातो, मात्र वांगचुक यांचा आग्रह असल्याने आरोप कायम राहतात. सोनम वांगचुक अटक प्रकरण हे फक्त व्यक्तीविरोधी नाही, तर लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या पारदर्शकतेसाठीची कसोटी आहे. सरकारने पारदर्शकतेने कारणे स्पष्ट केली, न्यायालयीन प्रक्रियेला वाव दिला. तर आणि तरच ‘ऑल इज वेल’ या घोषणेचा अर्थ खरा ठरू शकेल. आम्ही तर अशा परिस्थिवर स्पष्टपणे म्हणू, जेव्हा सत्याला अटक होते तेव्हा न्यायाला जागं राहावं लागतं, आणि न्यायाला जागं राहावयाचे असेल तर प्रश्न विचारावेच लागतील.
‘इज एव्हरीथींग रियल वेल’?
खरचं सर्व काही ठिकठाक आहे? म्हणजे ऑल इज वेल आहे, सोनम वांगचूक यांची अटक आणि त्यांना ठरवण्यात आलेलं देशद्रोही ही हुकुमशाही नाही का? लडाखमधील लोक या कारवाईवर संतापून प्रतिक्रिया देतात, वांगचूक हे देशद्रोीह नाहीतर देशप्रेमी आहेत हे ठणकावून सांगतात. उभ्या देशातले बुद्धीजीवी वांगचूक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. परंतु ज्या पद्धतीने केंद्रातील मोदींचे सरकार प्रश्न विचारणार्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतं आणि त्यांना थेट देशद्रोही म्हणून अटक करतं तेव्हा हा देश लोकशाहीतून हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय का? हे विचारावं लागेल. लोकशाही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा असहमत आवाज ऐकले जातात. ते दडपले जात नाहीत. मात्र इथं असहमत आवाज जास्तीत जास्त पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातो. पंतप्रधानांसारक्या सर्वोच्च पदावर असलेला व्यक्ती जेव्हा आंदोलन करणार्यांच्या कपड्यावर भाष्य करतो, त्यांच्या पेहराव्यावर भाष्य करतो, आंदोलकांना ‘आंदोलनजीवी’ म्हणतो तेव्हा इज एव्हरीथींग रियल वेल? हा प्रश्न आम्हाला तरी पडतो. देशाल्या अनेक घटनाक्रमाकडे आपण पहात असताना सरकारकडे आणि सरकारच्या
व्यवस्थेकडे कटाक्ष
जेव्हा टाकतो ना तेव्हा गेल्या दहा वर्षांचा कालखंड डोळ्यासमोरून जातो आणि या कालखंडामध्ये ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ हा तीन तासाचा नव्हे दहा वर्षाचा एक चित्रपट तोही दिखावा आणि देखाव्याचा भाजपाकडून या देशात चालू आहे आणि या चित्रपटाचे नायक पंतप्रधान नरेंद्र मोदी, या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोघे असून खलनायक जो खरा देशभक्त आहे, जो व्यवस्थेला प्रश्न विचारतो, सत्यासाठी न्यायासाठी आणि हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरतो तो सर्वसामान्य भारतीय. या सरकारसाठी या व्यवस्थेसाठी खलनायक ठरतो. इते शेतकर्यांची आंदोलने झाली, इथे शिक्षणासाठी आंदोलने केली गेली. आरोग्यापासून सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी आंदोलने होत आहेत आणि केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार या आंदोलनाला एकतर दुर्लक्षित करून दाबते किंवा थेट देशद्रोहाचा खटला दाखल करून प्रश्न विचारणार्याला आतमध्ये टाकते. सोनम वांगचूक यांची चूक काय? त्यांच्यावर माध्यमातून बाहेर येणारे आरोप पाहिले तर सोनम वांगचूक यांना चीन, पाकिस्तानला जाण्यासाठी जेव्हा व्हिसा, पासपोर्ट दिला तेव्हा सरकार झोपलं होतं का? भाजपाच्या कार्यकाळामध्ये सोनम वांगचूक यांना अनेक पुरस्कार दिले गेले तेव्हा हे सरकार काय करत होतं? सोनम वांगचूक यांचे काम एवढेच चुकीचे होते तर सरकारने त्यांच्या संस्थेला तेव्हा जमीन का दिली? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. म्हणूनच आम्ही म्हणतोय, काळ दहा वर्षे सोकावलाय तो असाच सोकावत राहिला तर या देशात माणसात माणूस राहणार नाही.
सत्ताकेंद्र असावे
मात्र त्या सत्ताकेंद्रातून मतांचं ध्रुवीकरण करायचं असेल ते करा, अखंड भारताचे आणि अखंड भारतातील माणसांचे ध्रुवीकरण करू नका. माणसाला माणसामध्ये राहू द्या, जात-पात-धर्म-पंथापेक्षा माणूसधर्म हा सर्वश्रेष्ठ मानत विज्ञान धर्माला अंगीकारा. सोनम वांगचूक सारख्या वैज्ञानिकाच्या दूरदृष्टीकडे उघड्या डोळ्याने पहा. सत्तेसाठी ज्या डोळ्यावर झापड्या लावल्या आहेत त्या आधी काढा आणि लोका हो, प्रश्न विचारायला शिका, सत्यासाठी आवाज उठवायला शिका आणि आम्हीही म्हणू ‘पेटून उठा’





