तुका म्हणे, भीड खोटी
लाभ विचाराचे पोटी
त्यागी व्हा!
गणेश सावंत/9422742810
अखंड हिंदूस्तानचे पंतप्रधान, ‘निधड्या’ छातीचे ‘प्रवर्तक’ नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण नक्कीच नव्हते, ते होते देशाला आत्मनिर्भरतेचे गोड स्वप्न दाखवणारे डोस. ‘मोदी है तो मुमकीन है’ च्या नार्याला सिद्धीस्थानी नेण्या हेतू केलेला एक प्रयास आणि सरकारचं अपयश जनतेच्या माथी मारण्याचा तो ध्यास. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम कार्यपद्धत राबवा, स्थानीक उत्पादने खरेदी करा, सोन्याची खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, हे पंचतत्व अवलंबवा आणि आपली देशभक्ती सिद्ध करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन देशावर येणार्या भयावह संकटांचे, महागाईचे संकेत मानावे लागतील. दुर्दैव याचं वाटतं, जनतेला आत्मनिर्भरतेचे धडे देणार्या भारतीय जनता पार्टीने 2014 ते 2026 या बारा वर्षांच्या म्हणजेच एक तपाच्या कालखंडात वीज, इंधन, स्वदेशी यासह अन्य बाबींवर हा देश आत्मनिर्भर का होऊ शकला नाही? आज पुन्हा एकदा देशातील जनतेला आत्मनिर्भरतेचे गोड स्वप्न दाखवण्याची गरज का पडली? होय,

आशियातील युद्ध
आणि त्याचे जगभरात उमटत चाललेले पडसाद हे अत्यंत गंभीर आहेत. अनेक देशांनी वर्क फ्रॉम होम ही कार्यप्रणाली महिन्या दोन महिन्यांपूर्वीच राबवायला सुरुवात केली हेही सत्य आहे. पेट्रोल-डिझेल, इंधन, वीज यातही कटौती अन्य देशांनी केली हेही मान्य आहे. आजची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, अशा युद्धजन्य परिस्थितीत अखंड देशांनी एकत्रित येऊन या संकटावर मात करणे हेही नितांत गरजेचे आहे. परंतु सर्वसामान्य देशवासियांनीच त्यागाची भूमिका घ्यायची का? सत्ताधीश आणि त्यातील धनिक वर्ग यांना त्याग करण्याची गरज नाही का? असे एक ना अनेक प्रश्न आज एवढ्यासाठीच उपस्थित होतात. गेल्या आठ-पंधरा दिवसांपूर्वी देशातल्या पाच राज्यात ज्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये पैशांचा जो पाऊस सत्ताधिशांकडून पाडण्यात आला, हजारो लिटर नव्हे लाखो लिटर डिझेल, पेट्रोल त्या निवडणुकांमध्ये वापरले गेले, तिथे पंतप्रधान महोदयांना त्यागाची आठवण झाली नाही. मुळात त्याग कोणी करायचा? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा शंभर सर्वसामान्य माणसांना जेवढे इंधन, पाणी, सोने, चांदी वापरायला मिळते तेवढे नव्हे तर त्यापेक्षा अधिक सत्तेतला सहभागी असलेला एक आमदार रोज वापरात आणतो. मग देशातले सत्ताधिशांचे सर्व आमदार, सर्व खासदार, अन्य पदाधिकारी यांचा हिशोब जुळवला तर इंधन किती वाचेल हे लक्षात घेतले पाहिजे.

आत्मनिर्भर भारत
गेली अनेक वर्षे आत्मनिर्भर भारत, विश्वगुरू भारत, पाच ट्रिलीयन इकॉनॉमी, अशा घोषणा कानठळ्या बसेपर्यंत ऐकवण्यात आल्या, मग आज युद्ध पेटताच भारताची अर्थव्यवस्था एवढी का डगमगते? भारताच्या रुपयाला किंमत का मिळत नाही? तेलसाठे आपल्याकडे उपलब्ध होत नाहीत? आपण आयातीवर का अवलंबून आहोत? जागति बाजार हादरला, असे सांगून सरकार स्वत:च्या अपयशावर पडदा का टाकतय? एक तपापासून सत्ता हातात असताना ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता निर्माण करण्यात अपयश का ? पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा आवाहन करावे वाटले तेव्हा हे त्यांना प्रश्न पडले नाहीत का? त्यांनी केलेल्या आवाहनातून अपयशाची अधोरेखिता दिसून येत नाही का? सर्वसामान्य माणूस आधीच महागाईच्या खाईत लोटलेला गेलेला आहे. पेट्रोल-डिझेल,गॅसचे भाव गगनाला भिडले गेलेले असताना सरकारकडून कर कपात करण्याऐवजी काटकसरीचा उपदेश जनतेच्या माथी मारला जातोय. ज्याच्या घरी रोजचा चूलधूर महागाईने बंद पडत चाललाय त्यांना आता सोनं घेऊ नका, परदेशात जाऊ नका, असं सांगणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा भाकरीऐवजी ब्रेड खा म्हणण्यासारखे आहे.
हा कोरोना कोणाचा?
पंतप्रधानांनी कोरोना काळातील वर्क फ्रॉम होमचा दाखला दिला, तो कोरोना चीनने आणला, मग आता वर्क फ्रॉम होम करण्याचे सांगून देशाला पुन्हा ताळेबंद केलं जात नाही का? त्यावेळी लाखो लोक बेरोजगार झाले, छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडले गेले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, एसी रुममध्ये बसून ऑनलाईन मिटिंग करणार्यांसाठी वर्क फ्रॉम होम सोपे असेल पण रस्त्यावर जो रोज घाम गाळतो, त्या कामगारांचे शेतकर्यांचे, दुकानदारांचे काय? विशेष म्हणजे जनतेला काटकसरीचे धडे देणारे सत्ताधारी आणि खासरून भारतीय जनता पार्टी आपल्या प्रत्येक इव्हेंटचा जो सोहळा साजरा करतात, भव्य जाहिराती, राजकीय मेळावे, परदेस दौरे, अब्जावधीचे सरकारी सोहळे, ते थांबताना दिसत नाहीत. त्यागाची भाषा नेहमी जनतेसाठीच का राखून ठेवली जाते. सत्तेतील लोकांनी स्वत:च्या ऐशआरामी खर्चावर गदा आणली, तर कुठे पंतप्रधानांच्या आवाहनाला नैतिक वजन प्राप्त होईल. युद्ध गंभीर आहे, संकट मोठे आहे, परंतु प्रत्येक वेळा संकटाचं ओझं सामान्य नागरिकांच्या खांद्यावर टाकून सरकार स्वत:ची जबाबदारी झटकू शकत नाही. देशाला फक्त भाषणांनी नाही तर दूरदृष्टीच्या धोरणांनी आणि प्रामाणिक आत्मपरिक्षणाने आत्मनिर्भर बनवावं लागतं, अन्यथा विश्वगुरुच्या घोषणा आणि वास्तवातील हतबलता यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत जाईल. आम्ही जेव्हा पंतप्रधानांच्या या आवाहनाकडे पाहतो तेव्हा नक्कीच देशावरच्या संकटाचे नुसते अवलोकन नव्हे तर त्यातलं गांभीर्यही समजतो. आम्हाला फक्त
त्यागत् शान्ति: अनन्तरम्ं
भगवद्गितेच्या बाराव्या अध्यायातील बाराव्या श्लोकाचा हा ए भाग ज्याचा अर्थ अहंकार आणि कर्म फळाची अपेक्षा सोडून दिल्यावर मनाला खरी आणि कायमस्वरुपी शांती मिळते. बारा वर्षाच्या कालकंडामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागत् शान्ति: अनन्तरम्ं याची अनुभूती घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी त्यागाची अनुभूती घेतली तर अखंड देश त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यागाकडे प्रामुख्याने आकर्षित होईल, परंतु सत्ताधिशांचं बारा वर्षाचं वर्तन हे
भोगे घडे त्याग । त्यागे अंगा येती भोग
ऐसे उरफाटे वर्म । धर्म अंगीच अधर्म
देवअंतरे ते पाप। खोटे उगवा संल्प
तुका म्हणे, भीड खोटी । लाभ विचाराचे पोटी
तुकेबांच्या या संपूर्ण अभंगाचा अर्थ बाह्यत्याग करण्यापेक्षा मनातून विषयाची आसत्ती सोडणे म्हणजेच खरा त्याग आहे. सत्ताधीश भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी त्यागाची भावना कुठेतरी ठेवल्याची अनुभूती आली कोणाला ? सांगा आम्हाला!












