गणेश सावंत/9422742810
वर्षानुवर्षापासून शेतकर्यांकडे बोट दाखवले जाते. सेंद्रिय शेती करा, रासायनिक खतांचा वापर कमी करा, तुमच्या पिकांमुळे कॅन्सरसारखा आजार वाढत आहे, असे उपदेशाचे डोस शेतकर्यांना दिले जातात. शेतकरी जणू समाजाच्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे चित्र उभे केले जाते. तथाकथीत सुशिक्षीत म्हणवून घेणारे शेतकर्यांच्या कर्जमाफीला कधी सोकलेत तर कधी माजलेत म्हणून हिणवतात, पण आज एक प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारलाच पाहिजे. खरोखर विष कोण पेरतय? हा विषय इथे एवढ्यासाठीच मांडायचाय, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली अन् त्यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. या भूमिकेत दुधाचं दूध आणि विषाचं विष उघडं पडल्याचे स्पष्ट झाले. राज्यात दुधाचे जेवढे उत्पादन नाही त्यापेक्षा कित्येक पटीने दुधाची विक्री केली जाते. मग हे दूध येते कुठून? गेले कित्येक वर्ष आम्ही अपाल्या लेकरांना दुधातून दूध पाजत होतो की, विष? कुठय ती
नितीमत्तेची व्यवस्था
शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवतो, भाजीपाला उगवतो, दूध काढतो, दुसर्याच्या अन्नात माती कालवण्याचे पाप तो कधीच करत नाही, आज जे सत्य समोर येत आहे ते अधिक भयानक आहे. हे संकट शेतकर्यांच्या बांधावरचे नाही तर व्यवस्थेच्या पोटात जन्मलेलं आहे. ओठावर एक आणि पोटात एक असलेल्या व्यवस्थेच्या कानपटीत जबरदस्त चपराक मारणारं हे संकट आहे. तुकाराम मुंढेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्यांनी दुधाबाबत जी आकडेवारी दिली ती आकडेवारी पाहून अंगावर काटा येतो. राज्यात दररोज पंधरा लाख लिटर दुधाचे उत्पादन होते, परंतु बाजारात 65 लाख दुधाची विक्री होते. मग अतिरिक्त 40 ते 50 लाख लिटर दूध नेमकं येतं कुठून? गावागावांत जनावरांची संख्या पाहिली आणि शहरातल्या चौकाचौकात, नाक्यानाक्यावर आणि टपर्यांवर सुद्धा दुधाचे पाकिट पाहिले की, लक्षात येते, हे दूध गाई, म्हशींच्या स्तनातून नव्हे तर भेसळखोरांच्या पापी मनगटातून विक्रीसाठी आलय. उत्पादन कमी आणि विक्री जास्त होतेच कशी? आजपर्यंत या गंभीर प्रकरणाकडे कोणी कसे लक्ष दिले नाही?
दुधातली भेसळ
ही जीवघेणी आहे. अतिरिक्त दुधाचा माग काढला तर याचं उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. या मागे भेसळखोरांचं साम्राज्य आहे. या दुधात मेलामाईनसारखी रसायने मिसळली जाते. दूध घट्ट दिसावे म्हणून युरिया टाकला जातो. जास्त दिवस दूध टिकावं म्हणून अन्य घातक रासायणांचा वापर केला जातो. कॉस्टीक सोडा आणि इतर औद्योगिक केमिकलचा वापर सर्रासपणे या दुधात केला जातो. जे केमिकल संडास-बाथरूम साफ करण्यासाठी वापरला जातो त्याचाही वापर यामध्ये होतो. हे एवढं मोठं भयानक षडयंत्र कित्येक वर्षापासून सुरू होतं. ना शासनाला त्याचं देणंघेणं होतं ना गलेलठ्ठ पगार घेणार्या प्रशासनातील अधिकार्यांना याचं देणंघेणं होतं. या दुधाचा सर्वाधिक घातक परिणाम लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती, कुपोषीत, मुत्रपिंड विकार, यकृत आजार, पचनशक्तीचे विकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराला हे दूध एक निमंत्रण म्हणावे लागेल. आजपर्यंत
कारवाया का झाल्या नाही ?
हा जेवढा महत्वाचा प्रश्न तेवढेच शासन आणि प्रशासन व्यवस्थेतील निगरगट्ट, लाचारी हे त्याचं उत्तर. भेसळखोर सर्रासपणे माय मारण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्ही केवळ गाय वाचवण्यावर वाद घालत होतो. शेतकरी सेंद्रिय शेती करत नाहीत, रासायनिक खतांचा वापर करतायत, असं म्हणत शेतकर्यांविरोधात बोटं मोडत होतो. परंतु अन्न आणि दुधातली भेसळ रोखण्यासाठी यंत्रणा काय करत होती? तपासण्या कुठे होत्या? दोषींवर कारवाई का होत नव्हती? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा भेसळखोरांना परवाना कोणी दिला? कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढेंमुळे शासन आणि प्रशासन व्यवस्थेचे पूर्णत: वस्त्रहरण झाले. एकीकडे दुधाचे उत्पादन कमी आणि दुधाची विक्री कित्येक पटीने. अशावेळी शेतकरी विष पिकवत नाही, विष कालवणारी औलाद व्यवस्थेच्या सावलीत वाढली आहे, तिला फासावर लटकवण्याचे काम आता व्हायलाच पाहिजे.
तो तुका ते हा तुका
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकात व्यवस्थेविरोधात बंड पुकारले. एकीकडे परकिय सत्ता तर दुसरीकडे वाढणारे स्वराज्य अशा स्थितीतही धर्ममार्तंड आपल्याच लोकांचे हाल करत होते. तुकोबा बोलले, किर्तनातून समाजप्रबोधन केले, अभंग लिहिले, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हटले. अंधश्रध्देविरोधात आसूड ओढले, सर्वसामान्यांना स्वाभिमानाने राहण्याचे धडे दिले. न्यायाच्या पाठीशी उभा राहिले. त्याच संत तुकारामांच्या नावाचे तुकाराम मुंढे हे सत्याच्या मार्गावर न्यायाच्या मार्गावर आणि संविधान कायद्याच्या मार्गावर चालत सर्वसामान्यांचे हक्क देत आहेत. लोक त्यांच्या पाठीशी आहेत, भेसळखोरांचा बिमोड करण्यासाठी व्यवस्तेने त्यांच्या पाठीशी राहावे.









