बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना अनुदान व पीकविमा दोन्ही मिळाले पाहिजे – धनंजय मुंडे
अंबाजोगाई तालुक्यात पावसाने केलेल्या नुकसानीची धनंजय मुंडेंनी केली पाहणी
सरसकट मदतीसाठी नुकसानीचे अहवाल तातडीने सरकारला पाठवा – धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला सूचना
अंबाजोगाई (रिपोर्टर) अंबाजोगाई तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान पाहताना धनंजय मुंडे यांनी शेतीच्या बांधावरून थेट राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना थेट फोन करून बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात पावसाने केलेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. मागील 4 ते 8 दिवसात या भागात झालेल्या पावसाचे प्रमाण हे अतिवृष्टीच्या निकषांच्या कैक पटीने अधिक असून मागील दोन वेळा राज्य सरकारने शेतकर्यांना जी मदत दिली त्यात बीड जिल्ह्याला वगळण्यात आले होते. मात्र आताचे नुकसान पाहता कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक अनुदान व पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, कृषी विभाग व विमा कंपनीला योग्य ते आदेश देऊन तातडीने बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देण्याची कार्यवाही करावी, असे धनंजय मुंडे यावेळी बोलताना संबंधित अधिकार्यांना म्हणाले.
दिवाळीचा सण असूनही आज सलग तिसर्या दिवशी धनंजय मुंडे शेतकर्यांचे अश्रू पुसायला थेट बांधावर जाऊन पोचले आहेत. आज अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसर तसेच चोपनवाडी, पिंप्री, पट्टीवडगाव या भागात पावसाने झालेल्या शेती नुकसानीची धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केली. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच आपण राज्य सरकारकडे मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही नमूद केले.
राज्य सरकार स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नुकसानीचा अहवाल पाहूनच त्यानुसार कार्यवाही करत असते, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून व माणुसकी डोळ्यासमोर ठेऊन पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, तसेच नुकसानीचे अहवाल तात्काळ शासनास सादर करावेत, अशा सूचना धनंजय मुंडे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकार्यांना केल्या.
यावेळी माजी आ.संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, शिवाजी सिरसाट, तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, सुधाकर माले, माऊली जाधव, विलासबापू मोरे, अजित गरड, रणजित लोमटे, तानाजी देशमुख, सत्यजित सिरसाट, विश्वांभर फड, रामराव बडे, महेबूब शेख, काशीनाथ कातकडे, बालाजी डोंगरे, सुधाकर शिनगारे, दिलीप लव्हारे, चंद्रकांत वाकडे, महादेव वाकडे, महादेव लव्हारे तसेच तहसीलदार विपीन पाटील, संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांसह आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.