बीड (रिपोर्टर) यावर्षी 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी परतीच्या पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातल्यामुळे कारखाने सुरू होवू शकले नाही. बहुतांश मजूर तोडीसाठी त्या त्या कारखान्यावर गेले मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर पावसामुळे त्यांना काम करता आले नाही. तर अनेक ऊसतोड मजूर आपल्या गावीच आहेत. काहींची दिवाळी फडात तर काहींची गावात होत आहे. दिवाळीनंतर ऊसतोडणीला सुरूवात होणार आहे.
दरवर्षी दसर्याच्या दरम्यान सहकारी कारखाने सुरू होत असतात. यावर्षी अजूनही परतीचा पाऊस मुक्कामीच आहे. मराठवाड्यासह राज्यभरामध्ये पाऊस पडत आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच पण ऊसतोडणीला अडथळा निर्माण होवू लागला. 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू होणार असल्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र पावसामुळे कारखाने सुरू होवू शकले नाही. बहुतांश मजूर ऊसाच्या फडात जावून बसले पण पाण्यामुळे ऊस तोडता आला नाही. जे मजूर कारखान्याकडे रवाना झाले त्यांची दिवाळी फडात साजरी होत आहे. तर बहुतांश मजूर अजूनही आपल्या गावी असल्याने ते दिवाळी साजरी करूनच कारखान्याकडे रवाना होतील. राज्यात यावर्षीही मोठ्या प्रमाणात ऊस आहे. त्यामुळे लवकर ऊस तोडणीला सुरूवात करण्याची घोषणा शासनाने केली होती. पण अतिरिक्त पावसामुळे अजून तरी कारखाने सुरूच झाले नाही. काही बोटावर मोजण्याइतके कारखाने सुरूच झाले असतील. इतर सर्व कारखाने बंद आहेत. दिवाळीच्या दोन चार दिवसानंतर सर्व मजूर कारखान्याकडे निघतील आणि तेव्हा कुठे ऊसतोडणीला सुरूवात होईल.