गणेश सावंत
मो. नं. 9422742810
राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या क्षीरसागर घराण्याकडे पाहितलं जातं, त्या थोरल्या घरचे थोरले गेल्या पाच वर्षांपासून चक्रव्युहात अडकलेत. विधानसभेतला पराभव, राष्ट्रवादीतला दुरावा, शिवसेनेतला प्रवेश, या साडेतीन चार वर्षातल्या घडामोडीतून राजकारणातलं थोरलं घर नेमका कुठला निर्णय घेणार? त्यांच्या हातात कुठल्या पक्षाचा झेंडा येणार? ते कुठल्या पक्षात जाणार, त्यांनी कुठल्या पक्षात जायला हवे यासह अन्य बाबींवर अखंड जिल्ह्यात चर्चा होत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडात राज्याच्या राजकारणात जे राजकीय स्थित्यांतरे झाले आणि राजकीय स्थित्यांतरात राज्यात जी राजकीय उलथापालथ झाली त्या उलथापालथीनंतर बीड जिल्ह्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेबाबत सातत्याने चर्चा होत गेली. त्यात काल शिवसेनेकडून जाहीरपणे क्षीरसागरांचा आमचा संबंध नाही, असे सांगण्यात आल्यानंतर क्षीरसागर पुन्हा चक्रव्युहात अडकून पडले. क्षीरसागरांचं राजकारण हे जात-धर्मापेक्षा विकासाच्या नावावरचं आजपर्यंत दिसून आलं. मात्र राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी क्षीरसागर सातत्याने ज्या खेळी खेळत आले त्यात ते यशस्वी झाले. अल्पसंख्याक असताना जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची असलेली पकड ही राज्याच्या नेतृत्वांना दखलपात्र वाटू लागली. म्हणूनच बीड जिल्ह्याबरोबर राज्यामध्ये या थोरल्या घराचा दबदबा कायम राहीला. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये थोरल्या घरात फूट पडली आणि धाकल्याच्या पुत्राने बंड करत आपल्या काकाचा पराभव केला. इथूनच थोरल्या घरचे थोरले चक्रव्युहात अडकले. आता शिवसेनेनेही साथ सोडली तेव्हा
क्षीरसागर चक्रव्युह कसे भेदणार?
याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले. जयदत्त क्षीरसागर यांचे गेल्या तीस वर्षांचे राजकारण आणि नेतृत्व हे दखलपात्र म्हणावे लागणार आहे. या तीस वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांना अनेकदा पराभव स्वीकारावा लागला. कधी चौसाळा तर कधी बीड मतदारसंघाचे नेतृत्व करत ते बीड विधानसभा मतदारसंघावर स्थायिक झाले. घरात फासे पडल्यानंतर त्यांनी आघाडीची चाचपणीही केली, परंतु आता कर्तृत्व सिद्धीस आणि कर्तृत्वाचे धडे व्हावेत यासाठी उभ्या आयुष्याची राजकीय गोळाबेरीज सकारात्मक दृष्टीकोनातून बाहेर यायला हवी असते तशी प्रत्येक राजकारण्याची इच्छा असते. परंतु या पायरीवर जयदत्त क्षीरसागरांना पुन्हा संघर्ष आणि चक्रव्युह भेदण्याचे आवाहन समोर उभे ठाकल्याने क्षीरसागरांच्या उभ्या हयातीतील राजकारणाची गोळाबेरीज करत जिल्हा चर्चा करत आहे. लोक काय चर्चा करतील? यापेक्षा आम्हाला याची उत्सुकता आहे, की क्षीरसागर आता काय भूमिका घेतील… शिवसेनेने क्षीरसागरांची मानसिकता ओळखली आणि क्षीरसागरांनी शिवसेना सोडून जाण्याअगोदर शिवसेनेने भूमिका घेतली. ती भूमिका जयदत्त क्षीरसागरांसाठी या टप्प्यात मानसिकदृष्ट्या नक्कीच त्रास देणारी. कारण जिल्ह्याच्या राजकारणात ज्या व्यक्तीचा, ज्या घराचा दबदबा असतो त्या व्यक्तीला आणि घराला एखादा पक्ष दुरावा ठेवण्याची भूमिका जेव्हा जाहीर करतो तेव्हा त्यातून जो मॅसेज जायचा तो जातो. क्षीरसागरांपुढे नक्कीच हे आव्हान असले तरी एकमताने क्षीरसागरांनी भविष्याचे आव्हान आधीच तयार करण्याची परिस्थिती त्यांनीच तयार केली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. याचाच अर्थ क्षीरसागरांनी आपल्या भविष्याची वाट आणि कुठल्या तरी पक्षाचे दार ठोठावून ठेवल्याचे दिसून येते. आता मग क्षीरसागर कुठल्या पक्षात जाणार? केव्हा जाणार? हे प्रश्न पडणं आणि त्या प्रश्नावर व्यक्त होणं यात गैर काहीच नाही. परंतु
क्षीरसागर भाजपात जाणार
ते कोणाला परवडणार?
याकडेही लक्ष केंद्रित करावं लागेल. भाजपाच्या नेतृत्वामध्ये आगामी काळात असलेली बीड नगरपालिका क्षीरसागर लढवणार का? तर या प्रश्नाचं उत्तर सरळसरळ नाही. त्यामुळे जोपर्यंत बीड नगरपालिका निवडणूक होत नाही तोपर्यंत चक्रव्युहातले क्षीरसागर कुठल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतीलच हे सांगणे कठीण आहे. बीड शहरातलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यावर नक्कीच या थोरल्या घरची पीए.डी. झालेली आहे. त्यामुळे भाजपाच्या सिम्बॉलवर आपण इथे निवडणूक लढवू, हे कठीण असल्याचे तेही खुल्या मनाने कबूल करू शकतील. कारण निवडणुका म्हटल्या की, विकासाच्या राजकारणापेक्षा जातीच्या राजकारणाला अधिक महत्व प्राप्त होते आणि जेव्हा जातीचे आणि धर्माचे राजकारण होते तेव्हा जात,पात, धर्म, पंथाच्या मताच्या गाठोड्याकडे नेतृत्व करू इच्छीणार्यांकडे ली द्यावे लागते. मग हिंदुत्वाचा नारा देऊन ज्या भारतीय जनता पार्टीचा अश्व देशाच्या कानाकोपर्यात दौडत आहे हे म्हणण्यापेक्षा उधळत आहे, त्या अश्वावर बीडमध्ये क्षीरसागरांना स्वार होणं तितकसं परवडणारं आहे का? हे माझ्यासारख्याला सांगण्याची गरज नाही. कारण आम्हीही गेली 25 वर्षे बीड शहराचा आणि जिल्ह्याचं जातीतल्या मतांचं समीकरण समजून आणि उमजून आहोत. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालखंडात जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा क्षीरसागर आघाडीतून नगरपालिका लढवतील, भलेही ते शिवसेनेत असतील तरीही त्यांनी तीच भूमिका घेतली असती. आमच्या माहितीनुसार तर शिवसेनेच्या नेत्यांबरोबर क्षीरसागरांनी बीड नगरपालिका आघाडीसोबत लढवण्याची आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी दर्शविली होती. परंतु शिवसेनेला क्षीरसागरांचा विश्वास वाटेना. त्यामुळे शिवसेनेने थेट क्षीरसागरांना पक्षाबाहेर जाण्याचा रस्ता दावला. आता
ओबीसी नेतृत्व असलेले
भाजपातले सर्वेसर्वा पंकजा मुंडे आणि ओबीसी नेतृत्वच असलेले जयदत्त क्षीरसागर हे दोन मोठे नेते बीड जिल्ह्यासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात एका म्यानात मावतील? याचाही विचार करावा लागेल. भले पंकजा मुंडेंना भारतीय जनता पार्टीत डावलण्यात येत असल्याचे सातत्याने चर्चेत येते. तशा उघड नाराज्या नेतृत्वाकडूनही व्यक्त केल्या जातात. मग पंकजांना गतीरोधक टाकण्याहेतू भाजप नेतृत्वाची क्षीरसागरांना रसद असेल, तर क्षीरसागर भाजपात स्थिरावतील, हो परंतु सातत्याने समाजकारणाला, अर्थकारणाला आणि विकासकरणाला महत्व दिलेल्या क्षीरसागरांना धर्मकारण, जातीचं धोरण भाजपमध्ये मान्य करता येईल का? राजकारणामध्ये आणि युद्धामध्ये सर्व काही क्षम्य असतं, असं म्हटलं तरी ‘मंदिर वही बनायेंगे’ या भूमिकेत क्षीरसागर मतं तर मागू शकतील, असं आम्हाला तरी वाटत नाही. एक नक्की आहे ज्या घराने जिल्ह्यावर अधिराज्य गाजवलं, राजकारणातलं थोरलं घर म्हणून जे घर चर्चेत राहिलं, त्या घरच्या थोरल्यावर आज जी परिस्थिती ओढावली, ही चक्रव्युहात अडकलेल्या जयद्रतापेक्षा कमी नाही. इथेही आपला अनुभव, आपली राजकीय इच्छाशक्ती, आपले संपर्क आणि काकुंपासून जयदत्त क्षीरसागरांपर्यंत लोकांसोबत असलेले स्नेहभाव जयदत्त क्षीरसागरांना नेतृत्व करताना अडवू शकणार नाही हे मान्य करावे लागेल. आता प्रश्न पडतो हे चक्रव्युह भेदण्यासाठी किंवा या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी
क्षीरसागरांना मुहूर्त कुठला?
तर तो सरळसरळ नगरपालिका निवडणूक झाल्यानंतरचा. भारतीय जनता पार्टीमध्ये विसावण्याचा प्रयत्न, विचार क्षीरसागरांचा असेलही परंतु ते तिथेही गटबाजीत अडकणार नाहीत असे सांगणे कठीणच म्हणावे लागेल. कारण बीड जिल्ह्यातही भाजपाचे दोन विचार प्रवाह आहेत. हे झाकल्याने झाकत नाही, लपवल्याने ते लपत नाही आणि चर्चा केली नाही म्हणून कुणाला समजत नाही असंही म्हणणे चुकीचे आहे. एकूणच थोरल्या घरावर आलेलं संकट म्हणता येणार नाही परंतु चाळीस वर्षांच्या कालखंडामध्ये या थोरल्या घराने जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काय करायचं हे ठरवलं आणि तसं झालंही. कुठल्या पक्षामध्ये आपल्याला किती मान-पान हवा हे त्यांच्या मनाप्रमाणे मिळालं, परंतु पहिल्या वेळेस शिवसेनेने जाहीरपणे क्षीरसागरांना शिवसेनेपासून दूर ठेवल्याची जाहीर घोषणा ही 40 वर्षांच्या राजकराणाला भेदणारी नक्कीच म्हणावी लागेल. क्षीरसागर निर्णय घेतील यापेक्षा शिवसेनेने निर्णय घेऊन आपली विजयी पताका चर्चेत तरी कायम ठेवली. आता क्षीरसागरांसमोर कुठला झेंडा घेऊ हाती आणि चक्रव्यूह भेदण्याची निती ठरवण्याशिवाय पर्याय नाही.