बीड (रिपोर्टर): राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड जिंकल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या गटासह सत्ताधारी महायुतीच्या गोटात एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशनाला उद्या गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या सरकारचे हे शेवटचे हिवाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासह शेतकर्यांच्या प्रश्नावर विरोधक सत्ताधार्यांना घेरणार असल्याचे दिसून येत असतानाच बीडच्या जाळपोळीचे प्रकरणही अधिवेशनात प्रचंड प्रमाणात गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीडमधील आमदार हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार आहेत. दुष्काळ आणि अवकाळीच्या कात्रीत सापडलेला शेतकरी वर्ग आणि अधिक अधिक प्रमाणात गंभीर होत असलेला मराठा, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने भरथंडीत नागपुरात राजकीय गरमागरमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या अधिवेशनाकडे अता सर्वांचे लक्ष लागून आहे.
निम्म्या राज्याला दुष्काळी झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे जेव्हा सरकारने 40 तालुक्यांत दुष्काळ घोषित केला तेव्हा विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही आपापल्या भागातील दुष्काळाचे काय, असा सवाल सरकारला केला. त्यानंतर मंडल स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे दुष्काळी मंडळांत समावेशासाठी गावागावात आंदोलने सुरू झाली आहेत. एकीकडे दुष्काळाच्या या झळा बसत असतानाच राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा अवकाळी सरी बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात एकाच वेळी दुष्काळी आणि अवकाळीच्या प्रश्नावर दिलासादायक निर्णय घेण्याचा दबाव राज्य सरकारवर आहे. नियमित उपाययोजनांसोबतच भरीव तरतुदी, घोषणा कराव्या लागणार आहेत. विरोधकांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचे संकेत दिलेच आहेत. विशेषतः राज्य सरकारची पीक विमा योजनाच फसवी असल्याचा सूर विरोधकांनी लावला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सभागृहात घमासान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मराठा आरक्षणासह ओबीसी आणि धनगर समाजाच्या प्रश्न नाजूक हाताने सोडवावे लागणार आहेत. मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा होऊन एकमुखी ठरावाची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र तत्पूर्वी आरक्षणावरून होणारे रणकंदन कुशलतेने हाताळण्याचे आवाहन सत्ताधार्यांसमोर असेल. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने महिला अत्याचार आणि ड्रग्ज प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. मात्र अधिवेशनात सभागृहात विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवाय फडणवीसांकडून होणारा पलटवार तितकाच जबरदस्त असण्याची शक्यता आहे. बीडमधील जाळपोळीचे प्रकरण अधिक तीव्रतेने अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सत्ताधार्यांना घेरण्याहेतू विरोधकांनी व्यूहरचना आखल्याचे सांगीतले जाते.
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना रंगणार
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट 2 जुलैला सत्तेत सहभागी झाला. त्यानंतरचे पावसाळी अधिवेशन संभ्रमातच संपले. अधिवेशन काळातच मंत्री झालेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले. काका-पुतण्यांच्या राजकारणाचा अंदाज बांधण्यातच अधिवेशन संपले. मधल्या काळात मात्र राष्ट्रवादीचा तिढा सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीत निवडणूक आयोगात पोहोचला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर शरसंधान केले गेले. त्यामुळे या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.