मुंबई (रिपोर्टर): राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चारनंतर देणार आहेत. तत्पूर्वी निकाल लागल्याच्या आवेशात शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे तर दुसरीकडे इथून आपल्याला न्याय मिळणार नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात येू लागल्याने निकाल काय लागणार, हे उभ्या महाराष्ट्राला अपेक्षीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सेनेच्या वाघाची डरकाळी कोण फोडणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार असले तरी निकाल बेंचमार्क ठरेल, सर्वांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली आहे.
आज महाराष्ट्रातील राजकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपुर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागलं आहे. आज दुपारी चारनंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. मात्र राहुल नार्वेकर यांनी निकालापूर्वी मुख्यमंत्री ,कनाथ शिंदे यांची घरी जावून भेट घेतल्याने ठाकरे गटाच्या आमदारांनी त्यावर भाष्य करत नार्वेकरांची थेट नार्कोटेस्ट करा, अशी मागणी केली. तर संजय राऊत यांनी निकाल फिक्सिंग असणार, असे वक्तव्य केले. एकीकडे ठाकरे गटाचे आमदार आणि ठाकरे गट निकाल आपल्या विरोधात जाईल, अशा प्रतिक्रिया देत असताना दुसरीकडे कायद्याचा सन्मान केला जाईल, आमच्याकडे बहुमत आहे, आमच्याकडेच आमदार जास्त आहेत, जो निकाल येईल तो निकाल आम्ही स्वीकारू, आा गुदगुल्या होणार्या प्रतिक्रिया शिंदे गटाकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे निकाल काय येईल हे आधीच स्पष्ट होत आहे.