बीड (रिपार्टर): अजित पवारांनी बारामतीतल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये उमटत आहेत. ‘शेवटची निवडणूक आहे म्हणतील, भावुक होऊ नका. शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही,’ असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला, त्यावर आता धनंजय मुंडेंनी पलटवार केला आहे. ‘जितेंद्र आव्हाड साहेब एकत्र असलेल्या पवार कुटुंबात तेल घालून आग लावायचा प्रयत्न करू नका, असं गलिच्छ राजकारण करू नका, अजितदादांच्या बाबतीत सांभाळून बोला,’ असा इशारा धनंजय मुंडे यांनी आव्हाडांना दिला आहे.
‘जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचं करायचं तेवढं वाटोळं केलं, आपला इतिहास काढला तर हे सगळं लक्षात येईल. स्वत:ला काही तरी मिळवायचं आणि साहेबांच्या नंतर पूर्णपणे पक्ष तुमच्या ताब्यात घ्यायचा या उद्देशाने अशा पद्धतीचे आरोप अजितदादांवर करता. पवार साहेब आमचं आजही दैवत आहेत, त्यांना आमचंही आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो,’ असं धनंजय मुंडे म्हणाले.
‘आव्हाडांची प्रतिक्रिया व्यथित करणारी आहे, उरलेली राष्ट्रवादी कष्टी आहे, असं आव्हाडांच्या म्हणण्यावरून सरळ सरळ वाटतं. दादा आजही पवार कुटुंबाचे सदस्य आहेत, अजितदादा कधीही कुणाच्या मरणाचा दुरान्वयेही विचार करणार नाहीत, अशा हीन पातळीवर जाऊन दादा कधी राजकारण करणार नाहीत. दादा बोलले याचा विपर्यास करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत,’ असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
काय म्हणाले होते आव्हाड?
‘अजित पवारांनी हद्द पार केली आहे, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे का? याचा विचार अजित पवारांनी करावा. आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का? शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहील, हे विसरू नका. ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय. तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटते, आधीपण वाटतच होती. एवढं घाणेरडं राजकारण कधी बघितलं नाही,’ अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केली होती.