बीड (रिपोर्टर): पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी हातपंप खोदण्यात आले. हातपंप बसविण्यात आल्यानंतर त्याची नियमित दुरुस्ती केली जात नाही. दुरुस्तीअभावी हे पंप वर्षानुवर्षे बंद पडत असतात. यंदा दुष्काळी परिस्तिती आहे. अशा दुष्काळात बंद पडलेले हातपंप दुरुस्त केले तर कित्येक ठिकाणच्या नागरिकांना त्याचा फायदा होऊन पाणी उपलब्ध होऊ शकते.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली. पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मागणी होत आहे. शासनाने मागील सात-आठ वर्षात अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत बोअर खोदून त्यावर हापसे बसवले. हापसे बसवल्यानंतर त्याची नियमितपणे दुरुस्ती केली जात नाही. दुरुस्तीअभावी कित्येक हातपंप बंद पडलेले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत हातपंप दुरुस्तीचे कार्यालय असताना हे कार्यालय फक्त नावाला असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने हापसा दुरुस्तीबाबतचे निवेदन देऊनही हापसे वेळेवर दुरुस्त केले जात नाहीत. दुष्काळाची तीव्रता पाहता बंद केलेले हापसे दुरुस्त केले तर अनेक हापश्यांना पाणी येऊ शकते आणि त्यामुळे तेथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्या त्या पंचायत समिती कार्यालयांनी आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने बंद पडलेले हापसे दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.