बीड (रिपोर्टर): एप्रिल महिन्यामध्ये येत्या 11 तारखेला मुस्लिम धर्मियांची ईद साजरी होत असून याच महिन्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, महात्मा फुले जयंती आणि राम नवमी यासारखे धार्मिक सणोत्सव साजरे होत आहेत. यानिमित्त सर्व समाज बांधवांनी हे सणोत्सव शांततेत साजरे करावेत, सामाजीक शांतता कुठेही बिघडू देऊ नये. कुणाच्याही भावना दुखावतील अशा पोस्ट करू नयेत. अशा पोस्ट केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आणि पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये शांतता समितीच्या पदाधिकार्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक सण साजरे होत आहेत. तब्बल एक महिना पवित्र असे रोजे मुस्लिम धर्मियांनी धरून येत्या 11 तारखेला ईद साजरी होत आहे. त्यासोबतच येत्या 14 एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंती साजरी होत आहे. तर रामनवमीही याच महिन्यात साजरी होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सर्व समाजातील व्यक्तींनी सामाजिक शांतता राखावी, हे सणोत्सव शांततेत साजरे करावेत, सामाजीक शांतता बिघडवणार्यांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाकडून कोण कोणत्या दिवशी ड्राय डे ठेवता येतील याचीही माहिती मागविली असून महत्वाच्या दिवशी ड्रायडे ठेवण्यात येणार आहेत. समाज माध्यमावर आक्षेपार्ह विशेषत: तरुणांनी पोस्ट टाकू नये, अशा पोस्टा टाकणार्यांवर पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी या बैठकीत सांगितले. या वेळी काही मान्यवरांनी सूचनाही केल्या.