बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे फळ पिकांसह भाजीपाल्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यातील रुईपिंपळा येथील एका शेतकर्याने दोन एकर टोमॅटो लावलेले आहे. टोमॅटो काढण्याच्या वेळीच गारपीट झाल्याने यामध्ये सदरील शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे टोमॅटोचा अक्षरश: चिखल झाला आहे.
दोन दिवसांपासून मराठवाड्यामध्ये वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. काल वडवणी तालुक्यातील रुईपिंपळा येथे गारपीट झाली. या गारपीटीत बाळासाहेब शेषेराव आंधळे यांच्या दोन एकर शेतामधील टोमॅटोचा चिखल झाला. त्यांचे टोमॅटो तोडणीला आले होते तोच पावसाने गाठले. टोमॅटो लागवडीसाठी त्यांना तीन ते चार लाख रुपयाचां खर्च आला. टोमॅटोमधून त्यांना दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न अपेक्षीत होते, मात्र निसर्गाने घात केला आणि काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. शेतकरी आंधळे यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.