ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रालाही वेग
बीड , (रिपोर्टर)ः- राजकारणासह समाज कारणामध्ये अग्रेसर असलेल्या बीड जिल्ह्यात निवडणूकांचा हंगाम सुरू झाला की, जातीय समिकरणाच्या गोळाबेरजीमध्ये जातीय वादाचे रोपन करण्यास सुरूवात होती. आता लोकसभा निवडणूकीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या विकासावर भाष्य करण्यापेक्षा अथवा चर्चा घडवून आणण्यापेक्षा ‘कोण कोणत्या जातीचा?’ यावर अधिक भर दिला जात आहे. मुंडेंच्या राज्यात सर्वत्र मुंडेच अशा प्रकारचा सूर एकीकडे निघत असताना दुसरीकडे याच मुंडेंच्या राज्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र वाटप झाले आहेत. जिल्ह्यात आजवर तब्बल 64 हजार 800 प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून हे वाटप मुंडेंच्याच राज्यात झाल्याचे दिसून येते. त्यामुळे निवडणुकांना सामोरे ठेवून जातीवाद पेरण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर चर्चा घडवून आणणे अधिक महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया जानकारांतून व्यक्त केली जात आहे.
राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्या बीड जिल्ह्यात निवडणुकांच्या कालखंडात जाणीवपुर्वक जातीयवादाची पेरणी केली जाते. जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा जिल्ह्यात जातीय समीकरणे पुढे करून उमेदवाराच्या जातीबरोबर प्रशासनातील अधिकार्यांच्या जातीही समोर मांडल्या जातात. बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. आजवर 64 हजार 800 जणांना हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात अन्य जातीचेही अधिकारी होते मात्र त्यावेळी कुणबी प्रमाणपत्र अथवा ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्राबाबत इतकी तत्परता दाखविण्यात आली नव्हती, असे जानकार बोलून दाखवत आहेत. बीड जिल्हा तसा मागास म्हणून बहुचर्चीत आहे, ऊसतोड कामगारांचाही जिल्हा आहे. त्यामुळे निवडणुकांच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील विकासावर आणि महत्वपूर्ण प्रश्नावर अधिकतेने चर्चा होणे महत्वाचे. बीड रेल्वेपासून ते एमआयडीसीपर्यंत, बेरोजगारीपासून कारखानदारीपर्यंतचे विषय समोर यायला हवे, मात्र दुर्दैवाने हे विषय समोर येताना दिसून येत नाहीत. याउलट शासन आणि प्रशासनामध्ये मुंडेंचेच अधिराज्य अशा आशयाचा मॅसेज पेरून जातीय बिजारोपण जाणीवपुर्वक केले जात असल्याचे दिसून येते. बीड जिल्हा हा तसा वैचारिक जिल्हा आहे. त्यामुळे इथल्या प्रश्नांना अधिक महत्व देत विकासाच्या मुद्यावर चर्चा होणे अपेक्षीत आहे, असे जानकारांचे सांगणे आहे.