बीड /माजलगाव (रिपोर्टर): आम्ही मतदार संघातील समस्या आणि विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. परंतु भाजप उमेदवाराकडे विकासावर बोलायलाला काहीच नसल्याने ते सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जातीपातीचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप बजरंग सोनवणे यांनी माजलगाव तालुक्यातील मंगरूळ येथे गावकर्यांशी संवाद साधताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे, माजी मंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित, राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे यांच्यासह नारायणराव डक नारायणराव होके, मनोहर डाके, दयानंद स्वामी, दत्ता आबा, अण्णासाहेब डक, होके पाटील, मंजूर भाई, ड. गोले, माजी सभापती पंढरीनाथ लगड यांनी माजलगाव तालुक्यातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत.
येथे बजरंग सोनवणे मतदारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, आम्ही जातीपातीचे राजकारण करणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या परंपरेला जपणारी माणसे आहोत . मात्र मागील पंधरा वर्षा पासून एकाच कुटुंबात सत्ता असताना अद्याप जिल्ह्यातील रेल्वेचे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. याच गतीने जर काम राहिले तर आणखी 25 वर्षे रेल्वे मार्ग पूर्ण होण्यास लागतील . आम्ही फक्त वाट बघायची अन यांनी आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची अन पुन्हा पाच वर्षांनी तेच तुणतुणे वाजवायचे हा लोकांच्या भावनांशी खेळच असल्याचा आरोप त्यांनी केला . मात्र आपण निवडून आलो तर दोन वर्षांमध्ये रेल्वे चे काम पूर्ण करीन असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
त्याच बरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या खासदाराने तोंड उघडलेले प्रत्यक्ष कोणी पाहिले आहे काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्या सोबत माजलगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन होत असताना आज पर्यंत एकही नवीन प्रकल्प का आला नाही ? या प्रश्नाचे उत्तर खासदार देतील का असे म्हणून स्वतः विषयी बोलताना ते म्हणाले की, मी साधा जिल्हा परिषद सदस्य असताना दोन कारखान्याची चालू शकतो, परंतु सत्ता असताना स्वतःच्या वडिलांनी सुरु केलेला कारखाना बंद करून शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावण्याचे पाप केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र आपण निवडून आल्या नंतर मतदार संघातील दरडोई उत्पन्न वाढविणे. रोजगार निर्मिती वेगवेगळ्या प्रकल्प आणणे. आणि सामान्यांची चूल पेटण्यासाठी काम करणे हे माझे व्हिजन असल्याचे सांगितले. म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुतारीधारी माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.