गट क संवर्गातील 7 हजार 510 उमेदवारांचे भवितव्य टांगणीला
पुणे (रिपोर्टर): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट-क संवर्गातील सात हजार 510 पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. मात्र, मुख्य परीक्षेच्या चार महिन्यानंतरही निकाल प्रलंबीत असून, वाढत्या अफवांमुळे उमेदवार अक्षरशः हवालदिल झाले आहेत. आयोगाने या संदर्भात निदान दोन ओळींचे तरी अपडेट द्यावे, अशी भावना उमेदवार व्यक्त करत आहे.
महाराष्ट्र गट – क सेवा 2023 ची भरती प्रक्रिया रखडली आहे. पूर्व परीक्षा होऊन वर्ष उलटले असून, मुख्य परीक्षेलाही (डिसेंबर 2023) आता चार महिने झाले आहे. मात्र अजूनही टंकलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी घोषित झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राजेश (नाव बदललेले) सांगतो, “टंकलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतरही प्रत्यक्ष भरती व्हायला एक ते दोन वर्ष लागू शकतात.
करण टंकलेखन चाचणी, तिचा निकाल आणि शिफारसपत्र हातात पडेपर्यंत उमेदवारांचे अनेक महिने वाट पाहावी लागेल. त्यामुळे आयोगाने तत्काळ निकाल घोषित करायला हवा.” आयोगातील अंतर्गत वादामुळे निकाल लांबल्याची भीती उमेदवार व्यक्त करत आहेत. रखडलेल्या भरतीविषयी उमेदवार दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. आयोगाने निदान समाजमाध्यमांवर निकालासंदर्भात अपडेट द्यावे, अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.