बीड (रिपोर्टर): स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा पक्ष हा देशात आणि महाराष्ट्रात बहुजनांपर्यंत नेला मात्र आता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना बहुजनांबरोबर बहुजनांचे समर्थक असलेल्या वारसदारांना संपवायचेय म्हणूनच विद्यमान खासदार पुनम महाजन व प्रितम मुंडे यांचे तिकिट कापून बीडमध्ये केवळ पराभूत करण्यासाठीच पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. त्यावरही अधिक नगरच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी सुरेश धसांची उमेदवारी घोषीत करून अजित पवारांच्या पक्षासह भाजपात अंतर्गत गटबाजीला प्रोत्साहन देत पंकजांचे मते कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मंत्री सुरेश नवलेंनी केला.
ते बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. बीड लोकसभेच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे या मोठ्या अहंकारी आहेत. त्यांच्या अहंकारानेच त्या लोकांपासून दूर गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. अख्ख्या भारतामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे संपर्क कार्यालय जिल्ह्यात नव्हते. लोकशाहीमध्ये आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी उपोषणाचे अस्त्र उभारले जाते. त्यातून अनेक प्रश्न सुटतात. भारताला स्वातंत्र्यही उपोषणातूनच मिळालेले आहे. असे असताना मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मनोज जरांगे यानीं उपोषणे केली. त्यामुळे त्या मराठवाड्यातील अनेक उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. त्याची हेटाळली पंकजा मुंडे यांनी केली त्यामुळे त्यांनी मनोज जरांगे यांची क्षमा मागावी, असे असतानाच कर्तृत्वावर सरस असलेल्या बजरंग सोनवणे यांना लोकांनी निवडून द्यावे, असे आवाहनही सुरेश नवले यांनी केले. या पत्रकार परिषदेला माजी आ. उषाताई दराडे, माजी आ. सुरेश नवले उपस्थित होते.