कडा (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील पिंप्रीघुमरी येथे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या विकास बनसोडे याच्या हत्या प्रकरणातील सहा जणांना पोलिसांनी बारा तासांच्या आत जेरबंद करत त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दुसरीकडे विकास बनसोडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात झाले असून विकासचा मृत्यू हा अनेक ठिकाणी झालेली मारहाण, अंतर्गत रक्तस्त्राव व शॉकमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. आणखी फरारी चार आरोपींचा शोध सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या बोरगाव येथील विकासअण्णा बनसोडे हा आष्टी तालुक्यातील पिंपरीघुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर याच्याकडे काही वर्षांपूर्वी ट्रक चालक म्हणून कामावर होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते. 12 मार्च रोजी आपल्या मित्रांसमवेत तो पिंपरीला आला होता. आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे संशयावरून भाऊसाहेब क्षीरसागर याने त्याला पकडून पत्र्याच्या शेडमध्ये दोरीने डाबूंन वायरने मारहाण केली होती. यामध्ये 15 मार्च रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सर्वप्रथम भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर यांना ताब्यात घेतले होते. त्यापाठोपाठ स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा भाऊसाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संजय भंवर, सुशांत शिंदे यांना अटक करून काल न्यायालयासमोर उभे केले असता 24 मार्चपर्यंत या सर्व आरोपींना कोठडी मिळाली आहे तर तिकडे संभाजीनगरमध्ये काल विकासच्या पार्थीवदेहाचे शवविच्छेदन झाले. प्राथमिक अहवालामध्ये विकासचा मृत्यू हा अनेक ठिकाणी मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव व शॉकमुळे झाल्याचे सांगण्यात येते. या वेळी विकास यांचा भाऊ यांनी आरोपींना सरकारने फाशी द्यावी, अशी भावना व्यक्त करत भावाच्या खुनात मलाच फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत होत, असेही विकासचा भाऊ आकाश बनसोडे यांनी माध्यमांना सांगितले.








