गणेश सावंत
जसेच देवेंद्र फडणविसांचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले तसे महाराष्ट्राच्या अस्मितेला, इभ्रतेला, इमानाला, स्त्रियांच्या अब्रुला आणि थोर समाज सुधारकांच्या चारित्र्याला नख लावण्याचे काम काही नत्द्रष्ट पैदासींकडून सातत्याने होत आलं आहे. इतिहासाच्या पानातून भविष्याचा वेध घेण्यापेक्षा रक्तपाताच्या आणि धर्मांधतेच्या दंत कहान्यातून उभा महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा विडा जणू या नत्द्रष्टांनी उचलला. अशा वेळी सरकारने कठोर होत जातीय आणि धर्मांध अफुची नशा करणार्यांचे ढोपरं सोलन्याऐवजी अशा नत्द्रष्टांना केवळ चिल्लर म्हणून विधानसभेत गर्जायचंअन् प्रत्यक्षात मात्र त्यांना मोकळं रान करून सोडायचं, हा धांदाल खोटारडापणा जेव्हा राज्यकर्त्यांकडून होतो तेव्हाच

सरकारचा खुर्दा
झाल्याचे पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपूर्वी फडणविसांच्या जवळचा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, तो प्रशांत कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह भाष्य केलं त्यातून महाराष्ट्रात जो संताप उसळला सहाजिकच त्या संतापाचा अंत कोरटकराच्या मुसक्या बांधण्यातून व्हायला हवा होता मात्र महिना उलटला तरी कोरटकरवर कायद्याचा बडगा उगारला गेला नाही. त्याला जामीन मिळवण्यासाठी जणू वेळच महाराष्ट्राच्या गृहविभागाने दिला होता. कोर्टातही जेव्हा जामीन अर्ज फेटाळला गेला तेव्हा हा कोरटकर आता हिंदुस्तान सोडून देशाबाहेर पळून गेल्याचे सांगण्यात येते. जर प्रशांत कोरटकर देशाबाहेर पळून गेलेला असेल तर यापेक्षा गृहविभागाचे अपयश ते दुसरे काहीच नसेल. महाराष्ट्राच्या बापाला कोणी जर अभद्र शब्दात बोलत असेल अन् त्या नत्द्रष्टाला महाराष्ट्र सरकार काहीच करत नसेल तर सरकार एवढे कोणीच कर्तव्य कर्मातले षंड नसेल. जेव्हा कोरटकराचा विषय विधानसभेत आला, तेव्हा दस्तुरखुद्द गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, असं म्हणत मोठ्या आवेषाने फडणवीस आता कोरटकरांचं कानसुल सोलतात की काय, असं वाटलं. परंतु आज जेव्हा हा चिल्लर माणूस सरकारचा खुर्दा करून देशाबाहेर पळाला हे उभ्या महाराष्ट्राला समजलं तेव्हा
फडणवीस सरकार
अन् त्यांच्या कार्यप्रणालीबाबत साशंकता निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांना तत्कालीन मुक्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात एका समाजाचे व्हिलन म्हणून समोर मांडण्याचा प्रयत्न झाला अथवा ते व्हिलन म्हणून आले तेव्हा फडणवीस संपले, आता फडणविसांचं खरं नाही, असं वाटत असताना त्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महायुतीला भरघोस यश मिळालं आणि तेथूनच फडणविसांनी स्वत:ला हिरो म्हणून महाराष्ट्राच्या मनामनात आपली निर्मिती व्हावी याचा इत्यंभूत प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. कोणाच्या आठवणीत असेल की नाही, परंतु गेल्या सहा महिन्यांच्या कालखंडातले घटनाक्रम पाहता मराठा समाजाबाबत फडणविसांनी निर्माण केलेली आस्था, फडणविसांची पानीपत भेट आणि जिरेटोपाचा केलेला आळंदीतील सन्मान यातून बराच काही बदल फडणविसांनी स्वत:मध्ये केल्याचे दिसून येते. विस्तृत सांगायचं झालच तर पानीपतला मुख्यमंत्री म्हणून भेट देणारे फडणवीस हे एकमेव मुक्यमंत्री ठरले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र त्यांचे अंधभक्त शिवरायांच्या वेषात व्हायरल करतात, दस्तुरखुद्द पंतप्रधानांना कोणी शिवराय म्हणतं, स्वत: नरेंद्र मोदीही डोक्यावर जिरेटोप परिधान करतात, त्यावेळी मोदींविरोदात महाराष्ट्रात उडालेला संतापाचा भडका पाहता आळंदीच्या एका कार्यक्रमात जेव्हा फडणविसांना जिरेटोप परिधान करण्यास सांगितलं तेव्हा फडणविसांनी ज्या पद्धतीने जिरेटोप मस्तकी लावत सन्मानपुर्वक तो परत दिला त्यातून बरच काही स्पष्ट झालं होतं. फडणविस यांनी लोकांची मानसिकता चांगलीच ओळखली. असे स्पष्ट असले तरी
छत्रपतींचा अपमान
ते का सहन करता? हे मात्र अद्यापही समजू शकले नाही. प्रशांत कोरटकर हा जर चिल्लर माणूस आहे, असं सरकारला आणि दस्तुरखुद्द देवेंद्रांना वाटत असेल तर कोरटकर हा देशाबाहेर पळून जातोच कसा? हा सवाल सातत्याने विचारला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा कडेलोट व्हावा ही इथल्या प्रत्येकाची जनभावना. परंतु कडेलोट सोडा त्याच्या हातात हातकड्या असणं नितांत गरजेचं. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याचे एक फोटो व्हायरल होऊन समोर आले आणि उभा महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर आणि पोलिसांच्या कर्तृत्व कर्मावर शंका घेऊ लागला. एकीकडे
सरकारची शिवभक्ती
वेगवेगळ्या घोषीत केलेल्या योजनांतून दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करत आहेत, असं ते स्वत:हून सांगतात. सरकारने चालू अधिवेशनामध्ये अगर्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा चाळीस टक्के इतिहास यासह अनेक शिवभक्तीने प्रेरित होत केलेले काम सरकारची शिवभक्ती दाखवते, तिथेच कोरटकर सारखे वड्यावगळीचे फडणविसांसह शिंदे-पवारांच्या शिवभक्तीला देखाव्याचे स्वरुप आणते हे तितकेच खरे.









