
आंदोलनाचा तिसरा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष
गेवराई (रिपोर्टर) : गेवराई तालुक्यातील आरक्षित गायरान जमिनीवरील धारकांना न्याय मिळावा, तसेच त्यांच्या नावावर जमिनींची नोंद करावी, या प्रमुख मागण्यांसाठी भुमिहीन गायरान एकता आंदोलन तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत दखल न झाल्यामुळे या भूमिहीन गायरान एकता आंदोलन च्या वतीने भव्य साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भेट दिली.
दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यातील विविध गावांतील 86 ठिकाणी असलेल्या गायरान जमिनींवर स्थानिक धारकांना हक्क मिळावा, यासाठी ग्रामपातळीवर सभा घेण्यात आल्या होत्या. या गायरान जमिनीवर 40 ते 45 वर्षांपासून शेती करून उपजीविका चालवणार्या शेतकरी कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळावा, या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने दलित पँथरचे प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
यामध्ये सध्या कसत असलेल्या गायरान जमिनी धारकांच्या नावावर कराव्यात., शेतीमध्ये जसा पिक विमा दिला जातो, तसाच गायरान जमीन धारकांना पिक विमा द्यावा., गायरान जमिनी धारकांना घरकुल मंजूर करावे., पूर्वी पंचनामे झाले असल्यास ते पुनश्च करावेत., गायरान जमीन धारकांना तहसील कार्यालयात ओळखपत्र द्यावेत., गायरान जमीन धारकांसाठी स्वतंत्र आयुक्त नेमावा यासह ईतर मागण्यासाठी हे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात वृद्ध महिला व गायरान धारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी दिला आहे.









