राज्यातील बीड सह 19 जिल्ह्यात 50 हजार ते दीड लाखांहून अधिक शेतकरी एनपीएतबँकांकडून शेतकर्यांना वसुलीच्या नोटिसा
मुंबई, (रिपोर्टर)ः- सोलापूरसह राज्यातील 19 जिल्ह्यांमधील अर्धा ते दीड लाखांपर्यंत शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यसरकार अडचणीतील शेतकर्यांचा सातबारा कोरा करेल, या आशेने शेतकरी थकबाकी भरायला बँकांकडे फिरकत नसल्याने बँकांनी त्या शेतकर्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.
महायुती सत्तेत आल्यावर बळीराजाचा सातबारा कोरा करू, अशी ग्वाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत दिली होती. त्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस नेत्यांनीही जाहीरनाम्यात ते वचन दिले होते. नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीची आशा होती आणि त्यामुळे त्यांनी बँकांकडून घेतलेले पीककर्ज व मुदत कर्ज भरलेच नाही. आता राज्यातील बँकांचे 21 लाखांहून अधिक शेतकर्यांकडे 32 हजार कोटींची थकबाकी झाली आहे.
दुसरीकडे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी देखील आता थकबाकीत जात आहेत. बँकेचे कर्ज थकल्यावर पुन्हा त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. बँकांनी शेतकर्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअर’ पाहू नये, असे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र, बँकांमध्ये त्याचे पालन होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात आणि अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या विभागात त्याचे सर्वाधिक प्रमाण आहे.
जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी व थकबाकी
जिल्हा एकूण शेतकरी थकबाकीदार थकबाकी
बीड 5,26,120 1,38,528 1201 कोटी
जालना 4,23,826 1,55,956 1744 कोटी
धुळे 1,79,373 56,611 160 कोटी
वर्धा 2,31,380 72,379 913 कोटी
यवतमाळ 3,74,619 1,03,822 2256 कोटी
परभणी 4,18,161 1,27,759 1249 कोटी
हिंगोली 2,36,736 66,612 582 कोटी
नंदूरबार 93,093 25,641 388 कोटी
बुलडाणा 5,07,263 1,38,528 1201 कोटी
गोंदिया 1,36,652 33,143 160 कोटी
नांदेड 4,96,419 1,13,276 1052 कोटी
अमरावती 3,66,479 79,333 928 कोटी
धाराशिव 2,39,380 44,951 1037 कोटी
अकोला 2,27,677 41,801 347 कोटी
छ.संभाजीनगर 5,67,092 91,567 1463 कोटी
सोलापूर 8,03,110 85,395 2681 कोटी
या’ 19 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार
राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या रिपोर्टनुसार राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, बीड, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमधील किमान 50 हजार ते दीड लाख शेतकरी सध्या थकबाकीत आहेत. कर्जमाफीच्या आशेवरील 21 लाख शेतकर्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे खासगी सावकारांकडून जादा व्याजदराने व शेती, जागा, घर गहाण ठेवून कर्ज घेणार्यांची संख्या वाढू लागली आहे.






