
पूर ओसरला, पण जिल्हा दु:खाच्या डोहात
शेत रंडकं, रस्ते खडकाळ, पूल खचलेले आणि शेतकर्यांचे हृदय रडलेले

बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून): आठवडाभरात पावसाने रौद्ररुप धारण करत अवघ्या जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. गोदावरी, सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा या मोठ्या नद्यांनी आक्राळ-विक्राळ रुप घेत सोबतच्या पाण्याने आडवं येईल त्याला अक्षरश: झोपवून टाकलं. शेतातल्या पिकांबरोबर माती ओरबाडून नेली. चार दिवस पुराच्या विळख्यात असलेला जिल्हा गेल्या अठरा तासात काहीसा सावरत आहे. नद्यांचा पूर कमी होत आहे. आता खरं विदारक चित्र याची देही याची डोळा शेतकर्यांना पहावं लागत आहे. शेतातलं पिक गेलं, फळबागा गेल्या, कापूस, सोयाबीन, ऊस, तूर यासह अन्य पिके पावसाने पुराच्या पाण्यात घेऊन गेले. जिल्ह्यात 3 लाख 71 हजार हेक्टर म्हणजेच किमान साडेसात लाख एकर शेती उद्ध्वस्त झाली. आता जिल्ह्यातल्या घरा-दारात, शेतात, वस्ती-तांडा आणि गावागावांत केवळ अश्रुंचा पूर बायाबापड्यांचा हंबर्डा आणि दु:खांचा डोहच डोह पहायला मिळत आहे.

गेल्या आठवडाभरात बीड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कुठे 192 मि.मी. पर्यंत पाऊस झाला तर कुठे 100 मि.मी.पर्यंत एका दिवसात पाऊस झाला. आठवडाभरात हा मि.मी.चा आकडा लांबत गेला अन् पावसाच्या पाण्याने आक्राळ-विक्राळ रुप धारण केचले. अवघा बीड जिल्हा पुराच्या पाण्याने वेढला गेला. गोदावरी काठी गोदामाईचा रौद्रावतार, सिंदफणाने घेतलेले आक्राळ विक्राळ रूप, मांजराची तीच स्थिती, बिंदुसरेनेही आपली विध्वंस करणारी निती दाखवली अन् शेतापोतात नव्हे गावोगावच्या घरादारात पुराचे पाणी शिरले. शेतातले पिके उद्ध्वस्त झाले. कापूस गेला, सोयाबीनला कोंब फुटले, मकाची कणसे वाहून गेली. बाजरीचे बुचाड कंसासह कुठे वाहून गेले तर कुठे कंसाला कोंब फुटले. बागा जमीनदोस्त झाल्या, भाजीपाला चिरडला गेला अन् लेकरासारखे सांभाळलेले पिके पावसाच्या पाण्याने पाण्यात गेले. पुराने इथे शेत जमीनही खरडून नेली. कुठे रस्ते खोदले गेले, पूल खचले गेले, गेली पाच दिवस पावसाचा आणि पावसाच्या पाण्याचा अक्षरश: तांडव जिल्ह्यात पहायला मिळाला.
6 लाख 28 हजार 423 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगत आहे. 50 टक्क्यांच्या आसपास पंचनामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून दावा केला जातोय. तीनशेपेक्षा अधिक जनावरे या पुराच्या पाण्यात मृत्युमुखी पडले आहेत. सर्वकाही उद्ध्वस्त करून पूर गेल्या अठरा तासांपासून ओरसतोय. जसं पाणी कमी होतय, तशी डोळ्यांमध्ये आणि अंत:करणामध्ये आग भडकतेय. पुराचे पाणी ओसरतय, परंतु घरादारात, शेता-पोतात, वाडी-वस्ती-तांड्यावर जिकडे पाहिले तिकडे जे दु:खांचे डोह साचलेत ते दु:ख कोण दूर करणार? बायाबापड्या हंबर्डा फोडतायत.लेकरांना काय खाऊ घालायचं? पुढे त्यांचं कसं होणार? आता सरकारच आमचं मायबाप. पूर ओसरल्यानंतर जे चित्र दिसतय ते अत्यंत भयावह आहे. पंचनामे करण्यापुढचे आहे. तेव्हा सरसकट मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत आहे.








