
जिथं जाईल तिथं शेतकर्यांचा दादांसमोर अर्तटाहो
शक्य ते करू, पुन्हा शेतकर्यांच्या जीवनात सुगीचे दिवस आणू
सरकारची मदत प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे
कोणताही पुरग्रस्त शेतकरी उपेक्षित राहता कामा नये
प्रशासनाने खबरदारी घ्यावी
राज्य सरकार शेतकर्याच्या बाजुने मजबूतीने उभा
जे जे नुकसान झालं त्याचे तात्काळ पंचनामे करा

ज्या कुटुंबाचं मोठं नुकसान त्याला त्वरित अर्थसहाय्य व धान्य उपलब्ध करून द्या
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ज्या गरजा असतील त्या शासन पुर्ण करेल
तुमचा संसार परत उभा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू
अजितदादांनी भल्या सकाळी दौर्याला सुरूवात केली
आधी पिंपळगाव घाट नंतर हिंगणी खूर्दच्या पुरपरिस्थितीची पाहणी
दुपारी 11.30 वा. अजितदादा आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात
खोकरमोहाला भेट, तलावाची पाहणी, शाळेची पाहणी
बीड/शिरूर कासार (रिपोर्टर): अतिवृष्टीच्या राक्षसाने अजगराचं स्वरूप धारण करून बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांच्या शेतातील पिकाला, मातीला, घरादाराला अक्षरश: विळखा घातला. त्या विळख्याने पिके उध्वस्त झाली. शेतातील माती वाहून गेली, घरादारात पाणी शिरले, शेतकरी उध्वस्त झाला. शेतकर्याला भविष्याची चिंता करण्यापेक्षा आजचा आणि उद्याचा विचार करावा लागत आहे. खायचं काय हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. एवढी विदारक परिस्थिती बीड जिल्ह्याची आहे. तिच परिस्थिती याची देही याची डोळा पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे बीड मुक्कामी आले.

कोंबडं आवरायला जागं झाले अन् तांबडं फुटताच शेतकर्यांच्या बांधावर गेले. शेतातील नुकसान पाहितल्यानंतर दादांनी एका वाक्यात या अतिवृष्टीचे वर्णन करताना एवढेच म्हटले, ‘शेतकर्यांनी डोळ्यात साठवलेली सगळी स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून गेले हे फार मोठं दु:ख’ दादांचं हे वाक्य विदारक परिस्थितीतील सत्याला दर्शवणारे ठरले. पुढच्या क्षणी दादांनी थेट शेतकर्यांना आश्वासीत केले. राज्य सरकार शेतकर्यांबरोबर मजबूत उभा आहे. जे जे नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले. शक्य ते सर्व करू, पुन्हा आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात सुगीचे दिवस आणू, जगण्याला बळ देवू, दादांच्या या वाक्याने शेतकर्यांना काहीचं हायसं वाटलं. दादा शेतकर्यावर आलेल्या या संकटाचा गोवर्धन तुम्ही उचला, शेतकर्याला वाचवा, शेतकरी वाचला तर जिल्हा वाचेल, राज्य वाचेल आणि देश वाचेल, अजितदादांची पाहणी करण्याची पद्धत शेतकर्यांसोबत थेट संवाद साधतांना त्यांना दिलं जाणारं आत्मिक बळ, संकटसमयी शेतकर्यांसमोर बारा हत्तीचं बळ जानवत आहे.

विध्वंसकारी पावसाने बीड जिल्ह्यातील 6.50 लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतातील पिकांचे होत्याचे नव्हतं केलं, शेतातलं सोनं पुराच्या पाण्यात गाडलं गेलं. तेच पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री रात्री उशिरा बीडमध्ये डेरेदाखल झाले. आज सकाळी 6 वाजताच दादांचा दौरा निघाला, सर्वप्रथम त्यांनी बीड पासून काही अंतरावर असलेल्या मौजे पिंपळघाट येथे पुरग्रस्त भागांची पाहणी केली. येथील गावकर्यांशी संवाद साधत गावकर्यांना धिर दिला. त्यांचं मनोबल वाढवलं. तेथील पुलालगतची पाहणी करून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान अन् निर्माण झालेल्या धोक्याचा आढावा घेतला. पुरग्रस्तांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या सुचना करण्याचे निर्देश दादांनी यावेळी दिले. पुढे पुरामुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले. शेतकर्यांचं मोठं नुकसान झालंय. शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मदत कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे.
कोणताही पुरग्रस्त शेतकरी उपेक्षित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना केल्या. पुढे अजितदादांनी एरिगेशन डिपार्टमेंटला जिथे धरणाची, सांडव्याची अन्य काही पडझड झाली असेल ती तात्काळ दुरूस्त करा, पुढे दादांनी मौजे हिंगणी खूर्द येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. यावेळी दादांनी ‘शेतकर्यांनी डोळ्यात साठवलेली सगळी स्वप्नं पुराच्या पाण्यात वाहून गेले हे फार मोठं दु:ख’ असं म्हणत राज्य सरकार शेतकर्यांसोबत मजबूत उभा आहे. जे जे नुकसान झाले, त्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. ज्या कुटूंबांचं प्रचंड नुकसान झालं, त्यांना त्वरित अर्थसहाय्य करण्याचं त्यांनी सांगितलं, पुढे अजितदादा आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील मौजे खोकरमोहा गावाला भेट देण्यासाठी गेले, त्या ठिकाणी फुटलेल्या तलावाची पाहणी केली, नुकसानीचा आढावा घेतला, शाळेला भेट दिली, शाळेबद्दल असलेल्या प्रस्तावित मागण्या पुर्ण करण्यासाठी तातडीने पाऊलं उचलली जातील असे आश्वासन दिले. यावेळी गावकर्यांशी संवाद साधताना अजितदादांनी प्रत्येकाच्या परिवाराची विचारपूस केली. सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे. आपण या संकटाच्या काळातून जात आहोत आणि हे संकट आपण सर्व मिळून पार करू.
आपण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालत आहोत. जाती-पातीचा कसलाही विचार न करता, भेदभाव न करता प्रत्येकापर्यंत मदत पोहोचविण्यास आपलं सरकार कटीबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ज्या काही गरजा असतील त्या शासनाकडून पुर्ण केल्या जातील. तुमचा संसार परत उभा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे सर्वांना सांगितले.
उद्धव ठाकरे, ना. आठवले जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतीची पाहणी करणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बीड जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत. दुपारनंतर ते जिल्ह्यात येत असून साडेतीन वाजण्याच्या दरम्यान बीड तालुक्यातील कुर्ला येथील शेतीची पाहणी करणार आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही जिल्ह्यातील शेतीची पाहणी करणार आहेत. दुपारनंतर आठवले गेवराई तालुक्यातील काही गावातील शेतीची पाहणी करणार आहेत.








