
सर्व अधिकार्यांना प्रत्यक्ष फिल्डवर राहण्याच्या सूचना
मुंबई: मराठवाड्यात सहा जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातले. पुन्हा मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचं गडद सावट निर्माण झालं आहे, नदी, नाले यांनी प्रवाह बदलला आहे, शेतशिवारात, घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी, हिंगोलीमध्ये कयाधू, बीड, लातूर आणि धाराशिवमधून जाणार्या मांजरा नदीला पुन्हा पूर आला. या पावसाळ्यात मराठवाड्यातील 2857 गावांत शेती बाधित झाली आहे. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात पावसाने 90 बळी घेतले आहेत. अनेक भागांत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास बोलवावे लागले. पुन्हा एकदा परंडा तालुक्यास पुराने झोडपले. नांदेड, बीड शहरात पाणी घुसले. शाळा आणि अगदी पोलीस ठाण्यापर्यंत पाणी शिरले. मराठवाड्यात लातूर, नांदेड जिल्ह्यातील शाळा व शिकवणी वर्गास शनिवारी सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे.
याबाबतची पोस्ट फडणवीसांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे.सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती असल्याची माहिती देण्यात आली. माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग, हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होत असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. ही माहिती सकाळी 9 वाजतापर्यंतची असल्याची माहिती आहे.








