
सुरळीत वाहतुकीसाठी कर्मचार्यांची नियुक्ती करा
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील वाहतूक व्यवस्था ही सातत्याने बेशिस्त असते, अशी नेहमी ओरड होत राहते. ट्रॅफिक पोलीस आपल्या कर्तव्यात सातत्याने कसूर करतात, अथवा ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी पॉईंट चुकीचे दिले जातात, अशा एक ना अनेक तक्रारी पोलिसांबाबत येत राहतात. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तोंडावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या शिवराज पानसेंटर समोरील चौकात सातत्याने ट्रॅफिक जाम राहते. येथील ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी त्याठिकाणी कधीही ट्रॅफिक पोलीस उपस्थित नसतात. सणासुदीच्या काळात त्याठिकाणी ट्रॅफिक पोलीस कर्तव्यावर असावे, अशी माफक मागणी आता लोकांकडून येत आहे.
शिवराज पान सेंटरसमोरील चौकामध्ये प्रमुख रस्ते आहेत. एकतर मुख्य रस्ता धुळे-सोलापूर महामार्ग असून दुसरा रस्ता हा नवगण महाविद्यालयाकडे जातो. त्यामुळे याठिकाणी रहदारी प्रचंड प्रमाणात असते. प्रत्येकाला याठिकाणी रस्ता बदलावा लागतो. त्याच वेळी सातत्याने या चौकात ट्रॅफिक जाम होते. वाहन चालकांना सोडा, पादचार्यांनाही या ठिकाणावरून चालणे मुश्किल होते. विशेष म्हणजे हे ठिकाण जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थाना ठिकाणी आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तोंडावर हे स्थान आहे आणि हाकेच्या अंतरावर जिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे हा चौक रहदारीचा चौक सातत्याने मोकळ असायला पाहिजे. त्यामुळे येथील ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी पोलीस असावेत, अशी मागणी होत आहे.








