गेवराई : (रिपोर्टर) गेवराई शहरालगत असलेल्या पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या एका मंदिरातील श्री गणेश मुर्तीची अज्ञात माथेफिरूंनी तोडफोड करून विटंबना केल्याची अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. पवित्र ठिकाणी अशा प्रकारची विटंबना झाल्याचे समजताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. अनेकांनी हा प्रकार पूर्वनियोजित व जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
श्री गणेश हे हिंदू समाजासाठी श्रद्धा, विश्वास आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. अशा दैवताच्या मूर्तीची विटंबना करणे म्हणजे समाजाच्या श्रद्धेवर थेट हल्ला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. हा प्रकार केवळ तोडफोडीचा नसून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचेही मत अनेकांकडून मांडले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भाविक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत निषेध नोंदवला. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ आणि गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोपींचा त्वरित शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












