मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असून, या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस 12 तारखेला एकत्र येणार होत्या, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, या विलिनीकरणासंदर्भात एक बैठक झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या बैठकीत सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, अजित पवार यांनी राज्याची जबाबदारी सांभाळणे, तसेच प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली होती.
यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत हे दावे फेटाळले. “सध्या प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने माहिती सांगत आहे. पण त्याला नेमका पुरावा काय? ही काही अधिकृत माहिती नाही,” असे भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की, “मला फक्त एवढंच माहिती आहे की बारामती येथे कृषी प्रदर्शन भरलं होतं. त्यावेळी ही सर्व मंडळी एकत्र आली होती. त्या वेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित लढाव्यात, एवढंच ठरलेलं होतं. त्यापलीकडे काहीही ठरलेलं नव्हतं. हे स्वतः अजित पवार यांनी मला सांगितलं होतं.”
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचाही उल्लेख भुजबळ यांनी केला. “जर अशा प्रकारचं काही ठरलं असतं, तर अजितदादा यांनी ते माझ्याशी शेअर केलं असतं,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं, असं भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी, “जे या बैठकीला नव्हते, त्यांना काय माहिती?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, “ही सर्व मंडळी कृषी प्रदर्शनासाठी एकत्र आली होती. अचानक तिथे कोणतीही बैठक होणार आहे, याची कुणालाच माहिती नव्हती. आणि जर तसं काही घडणार असतं, तर दोन्ही बाजूंचे दहा-पंधरा लोक एकत्र बसून औपचारिक बैठक झाली असती.”
शेवटी बोलताना छगन भुजबळ यांनी, “या सगळ्या विषयावर आता अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच घेतील,” असे स्पष्ट संकेत दिले.








