गणेश सावंत
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे आणि देशभरातल्या माणसात स्वाभिमान जागृत करण्याची किमया महाराष्ट्रातल्या साधू-संत-सुफी आणि समाजसुधारकांनी केली. पुरोगामित्वाला अनन्यसाधारण महत्व देणारे महाराष्ट्रासारखे अन्य कुठलेही राज्य नाही. इ.स. 16 व्या शतकापासून ते पारतंत्र आणि स्वातंत्र्यातही अनेक समाजसुधारकांनी, संतांनी जात-पात-धर्म-पंथ विरहीत समाज घडवण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला तो याच महाराष्ट्रात. क्रांतीकार्यांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले, अनेक हुतात्मे झाले, ते महाराष्ट्राच्याच मातीत जन्मले. असा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राचा असताना आम्ही कर्मदरिद्री आणि दळभद्रीच असल्याचे राजकारण्यांच्या उपसुट मुद्यावरून पहायला मिळते. राज्यात ज्या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी, ज्या प्रश्नांची उकल करायला हवी त्या प्रश्नांवर, त्या गोष्टींवर इथे चर्चा होत नाही. मात्र अनाठायी विषय समोर आणायचे आणि त्यावर रवंथ करत आपले स्वार्थ साधायचे हे उद्योग सध्या सत्ताधार्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वांचेच म्हणावे लागेल. कारण इथे आज विरोधक कोण ? आणि सत्ताधारी कोण? हे सांगणे कठीण आहे. चालू पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्रातल्या बहुदा सर्वच पक्षांनी वर्ष दोन वर्षांची सत्ता भोगली आहे. त्यामुळे इथे हमाम मे सब नंगे म्हणावे लागतील. लोकांच्या प्रश्नाला महत्व देण्यापेक्षा जात, धर्म, हिंदू-मुस्लिम, मराठा, ओबीसी, अशा विषयांना अधिक हवा दिली जाते. महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवारांनी काल-परवा वारकरी संप्रदायामध्ये
प्रतिगामी
लोकांची घुसखोरी झाली आहे, हे लोक वारकर्यांना धर्मांधतेकडे घेऊन जात आहेत, हा धोका वेळीच ओळखायला हवा, असे म्हटले. त्यावरून अपेक्षेनुसार भारतीय जनता पार्टीच्या टोलधाडीने शरद पवारांवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. दस्तुरुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्ट करताना शरद पवारांचे हे मत चुकीचे आणि आक्षेपार्ह आहे. वारकरी संप्रदायात शहरी माओवाद्यांशी संबंधित लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वारकरी संप्रदायाने झिडकारले. वारकरी विचारांशी संबंध नसणार्यांनी किंबहुना त्यांच्या विरुद्ध विचारांच्या मंडळीने यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही जण शहरी माओवादी होते, असे थेट मुख्यमंत्र्यांनी म्हटले. वारकरी संप्रदाय हा विठ्ठलनामाचा गजर करणारा आणि माणसाला माणूस म्हणून पाहणारा संप्रदाय आहे. इथे प्रतिगामित्वाला अथवा शहरी माओवाद्याला कधीच स्थान दिले जाणार नाही. परंतु प्रतिगामी असणारे काही तथाकथीत वारकर्यांच्या वेशात या राज्यात आणि देशात नक्ीच धर्मांधता पसरवतात हे सत्य स्विकारावे लागेल. राजकारणी सत्तेसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात अखंड देशाला नक्कीच आलेला आहे आणि या राजकारण्यांच्या मोहपाशात देशातली जनता सातत्याने अडत आलेली आहे. तिथे वारकर्यांचं काय? कारण
माकडे मुठीशी
धरीले फुटाणे
हा जगद्गुरू संत तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे. एका व्यक्तीने माकडे पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले. माकडाने त्यात हात घालून फुटाण्याची मूठ भरली त्यामुळे मूठ बाहेर निघेणा, मूठ सोडून हात बाहेर काढावा तर फुटाणे येईनात. अशा कठीण परिस्थितीत आपलं हित कशात आहे, मूठभर फुटाणे सोडण्यात की, मूठभर फुटाण्यांसाठी त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकण्यात हे समजण्याअगोदर माकडाला तो व्यक्ती पकडतो. हा मतितार्थ असलेला ‘अभंग माकडे मुठीशी धरीले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे, काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते शुके नळीकेशी, गोवियेले पाये, विसरुनी जाये पक्ष दोन्ही, तुका म्हणे एक ऐसे पशूजीव न चले उपाय काही तेथे’ ती स्थिती राजकारणी आजच्या सर्वसामान्य जनतेची करून ठेवताना दिसून येतात. इथे बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण या महत्वाच्या प्रश्नांसह सिंचनाचा आभाव, दुष्काळ, शेतकर्यांच्या आत्महत्या या प्रश्नाला सरकारकडून सातत्याने बगल दिली जाते. जात-पात-धर्म-पंथांचे विषय सातत्याने समोर मांडले जातात. जगद्गुरू संत तुकोबांनी वारकरी संप्रदाय एवढा तटस्थ आणि माणसाला माणूस म्हणून पाहणारा उभा केला की
त्याचे हाणून थोबाड फोडा
असं म्हणत, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कुठलेही कर्मकांड करण्याची गरज नसल्याचे तुकोबांनी स्पष्ट केले. फक्त नाम:स्मरण केल्यानंतर ईश्वराला प्रसन्न वाटतं, हे तुकोबांबरोबर अनेक संतांनी म्हटले. ईश्वर हा समक्ष दिसत नसतो तो रंजल्यागांजलेल्यांची सेवा जो करतो त्या माणसात ईश्वर पहायचा असतो, असेही संतांनी म्हटल्याचं निदर्शनास येतं. संत गाडगेबाबांनी ‘बाबा रे, देव कुणाला दिसला पण नाही अन् कुणाले दिसणार पण नाही, देव माणसात पहायला शिका, त्याची सेवा करा’ असे स्पष्टपणे म्हटले आहे. तुकोबांनी सातत्याने भोंदूपणावर आसूड ओढताना ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावूनिया राख डोळे झाकुनिया करती पाप’ असं म्हणत धर्माचा आणि देवाचा बाजार मांडणार्यांच्या कानसुलात सनसनीत चपराक मारली. आपण संत आहोत, हे दाखवण्यासाठी काही लबाड लो भोंदावया मिस घेवूनिय संतांचे करी कुटुंबांचे दास्य सदा, असे अनेकजण पदोपदी पहायला मिळत असल्याचे तुकोबांनी म्हटले. काही भोंदू अक्षरश: नशा करतात, त्यावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात, ऐसे संत झाले काही तोंडी तंबाखुची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली, भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग, सोळाव्या शतकात तुकोबांनी कलियुगात असे फार संत झाले की ज्यांच्या तोंडामध्ये नेहमी गांजाची चिलम असते. तेव्हा जे मांडले ते
नाशिकमध्ये दिसले
महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी जेव्हा जेव्हा समाजाचे प्रबोधन केले, आपले विचार मांडले, तेव्हा तेव्हा समाजाने ते विचार आत्मसात करायला हवे होते, मात्र समाजाचा ेवळ राजकारणासाठी आणि स्वार्थासाठी वापर करणार्या तथाकथीत सत्ताकारणी लोकांनी सर्वसामान्यांना देव आणि धर्म हा समजूच दिला नाही. म्हणून अशोक खरातसारखे निगरगट्ट नागडे इथे संत म्हणून मिरवायला लागले. अशा थोतांडांच्या कानफटात लावताना टीळा-टोपी घालूनीय माळा म्हणती आम्ही साधू. दया-धर्म चित्त नाही ते जाणावे भोंदू असे तुकोबांनी आपल्या अभंगातून म्हटले आहे. नाशिकच्या अशोक खरात या नालायक माणसाने धर्माच्या आड श्रध्देच्या मुखवट्यात जो किळसवाणा प्रकार केला त्यावर भाष्य करण्यापेक्षा किंवा तसे थोतांड करणारे सापडवण्यापेक्षा जगद्गुरू संत तुकारामांपासून ज्ञानेश्वर, नामदेव या संतांनी उभारलेल्या वारकरी संप्रदायावर भाष्य करणे कितपत योग्य आहे? वारकरी संप्रदायाची पायाभरणी ही माणसाला माणूस म्हणून पाहण्याची आणि तिचा कळस हा केवळ आणि केवळ नाम:स्मरणाचा तिथे कर्मकांडाला स्थान नाही, असे असताना आम्हाला म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांना पुन्हा एकदा धर्माच्या आडून
धर्मांधतेची मेख
मारणे समाजहिताचे नक्कीच नाही. कर्मकांडाला तिलांजली मिळायलाच पाहिजे कारण इथे ‘जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा’ हा खरा धर्म आहे, ही खरी पुजा आहे. असे संतांनी अनेकदा समाजप्रबोधन करताना म्हटले असताना आम्ही आमच्या मस्तकामध्ये लोकसेवेला महत्व देत नाहीत आणि धर्मांधतेला महत्व देतो, तात्पर्य एवढेच वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी अथवा माओवादी हे लोक घुसणार नाहीत, याची दक्षता वारकर्यांनी घेण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्ये व्यक्तीने जगद्गुरू संत तुकोबांची गाथा, संत नामदेवांची गाथा आत्मसात केली. गाथा डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतली तर नक्कीच धर्मांधतेच्या पेकाडात लाथ बसेल आणि तुमची-आमची माकडे मुठीशी धरीले फुटाणे असे हाल होणार नाहीत.











