सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 20 सप्टेंबर रविवार अग्रलेख
आभाळ कोरडे, सरकारचे डोळेही ?
गणेश सावंत/9422742810
मायबाप सरकार! मराठवाड्याचा दुष्काळवाडा होवून बसलाय. शेतातले उभे पिक अक्षरश: करपून गेलेत. विहीरीमधल्या पाण्यांनी तळ गाठलाय, जनावरांच्या चार्यांचा प्रश्न आऽ वासून उभा आहे. आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी मराठवाड्यात सरण जवळ करतोय. त्यात या दुष्काळाने शेतकर्यांचं मरण अधिक जवळ करून टाकलंय. मराठवाड्यातली ही भयावह परिस्थिती भविष्यात शेतकर्यांना थेट सरणावर घेवून जाणारी आहे. मायबाप सरकार ‘जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा जमीनीलाच नाही तर माणसाच्या काळजालाही भेगा पडतात. विहीरीचे पाणी तळ गाठतेय तेेव्हा शेतकर्यांचे आश्रुही कोरडे पडतात’ आता तरी डोळ्यावरचे झापडे काढा, मराठवाड्याची सद्य आणि सत्य स्थिती याची डोळा याची देहा नुसती पाहू नका, ती आत्मचिंतीत करा आणि मराठवाड्याला दुष्काळातून कायमचं कसं बाहेर काढता येईल ते पहा. मराठवाड्यातला शेतकरी सरणावर जाणार नाही मराठवाड्याच्या शेतीचा मसनवटा होणार नाही याची दक्षता कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष सिंचनाचे कामे सुरू करून मराठवाड्याला आधार द्या, आज मितीला
जसे आभाळ कोरडे
तसे सरकारचे डोळेही कोरडे
हे आम्ही अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करत आहोत. मराठवाड्यातला दुष्काळ हा नुसता निसर्गाचा कोप नाही. तो शेतकर्यांच्या उंबरठ्यावर उभा ठाकलेला एक जीवंत प्रश्न आहे. शेतात पिक नाही, विहीरीत पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही, लेकराबाळांच्या तोंेडात कशाचा घास घालायचा? वृद्ध मातापित्यांच्या डोळ्यात अश्रु येणार नाहीत यासाठी काय करायचे? या गंभीर प्रश्नांनी आज शेतकर्यांच्या डोळ्यात भविष्याची आशा उरली नाही. परंतू इकडे सरकारी कागदावर पाहणी सुरू आहे. बैठका सुरू आहेत. पंचनामे सुरू आहेत. आश्वासनाचा पाऊस मात्र धो धो पडतोय. दुर्दैवं याचं वाटतं माझा शेतकरी कित्येक दिवस पावसाची वाट पाहतोय. ढग येतात, आशा निर्माण करतात आणि पुन्हा रिकाम्या हातांनी निघून जातात. शेतात उभ्या असलेल्या पिकांची अवस्था पाहिली की काळीज पिटाळून जातं. पेरणीसाठी खर्च केलेला पैसा मातीत गेला. खत-बी-बियाणे, औषध मजूरी यासाठी घेतलेले कर्ज डोक्यावर जशासतसे आहे. उत्पादन नाही, उत्पन्न नाही आणि कर्ज फेडण्याचा मार्गही उरला नाही. अशा स्थितीत आजचा शेतकरी चिंताक्रांत होत आपलं दुष्काळाच्या लाकडाने सरण रचतोय आणि आमचं सरकार मायबाप कोरड्या आभाळागत कोरड्या डोळ्याने निगरगठ्ठपणे
काजू-बदामावर ताव
मारतयं. आम्हाला आश्चर्य वाटतं, मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला शेतकरी मरणशय्येवर असतांना त्या दुष्काळावर उपाययोजनांबाबतच्या बैठकांमध्ये सरकारचे मंत्री, आमदार कोरड्या डोळ्याने काजू-बदाम खात असतील, मिल्कशेक पित असतील, बिस्लरीचे पाणी हात धुण्यासाठी वापरत असतील तर अशा सरकारकडून अपेक्षा त्या शेतकर्यांनी काय ठेवायच्या? आमदार, मंत्र्यांनी बदाम खावेत, काजू खावेत आणखी काय काय खायचं ते खावं याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही मात्र आमचा शेतकरी उपाशी झोपणार नाही, त्याच्या मुलाच्या भविष्याचे वाटोळे होणार नाही, शेतकर्यांच्या म्हतार्या माय-बापांना आपल्या लेकरांची काळजी वाटणार नाही असे धोरण राबवणे आणि त्याची अंमलबजावणी होणे हे आज मितीचे सरकारचे सर्वोत्तम सत्कार्य असेल. परंतू ते सत्कार्य केव्हा होणार, आमचे देवाभाऊ नेहमी अश्वस्थ करणारे विधान करतात. आम्ही आता मराठवाड्याचा कायापालट करू, कायमचा दुष्काळ दुर करू, पुढच्या पिढीला दुष्काळ भोगावा लागणार नाही हे
देवाभाऊंचे आश्वासन
गेल्या 12-15 वर्षांच्या कालखंडामध्ये एक-दोन वर्षांचा कार्यकाळ सोडला तर महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टीचे अधिराज्य आहे आणि महाराष्ट्राचा कासरा हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी आणि आजपर्यंत त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप न झालेले महाराष्ट्राच्या राजकारणातले एक व्यक्तीमत्त्व आहे. त्यामुळे देवाभाऊंच्या आश्वासनाला अनन्य साधारण महत्त्व येते. म्हणूनच आमच्या सारखेही देवाभाऊंच्या वक्तव्यांची दखल घेतात. देवाभाऊंनी गेल्या काही वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या दुष्काळवाड्यावर भाष्य केलं, मराठवाड्याच्या सिंचनावर भाष्य केलं, आधीच्या लोकांनी मराठवाड्याला उध्वस्त करून टाकलं हाही आरोप आमच्या पचनी पडला मात्र देवाभाऊंनी नंतर जे दोन मोठे वक्तव्ये केले ते अत्यंत दखलपात्र आणि आमच्या सारखे जे दुष्काळात वाढलेले आहेत त्यांना ओलावा निर्माण करून सोडणारे होते. आता मराठवाड्याचा दुष्काळ मिटवणार, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही हे तेच वक्तव्य जे देवाभाऊंनी केले होते. मात्र एक तप गेला, 10 ते 12 वर्षांचा कालखंड हे वक्तव्य करून उलटून गेले. परंतू मराठवाड्यात सिंचन वाढावं यासाठी देवाभाऊच्या कालखंडात एकही प्रकल्प सुरू होवू शकला नाही. मग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आम्ही तुम्हाला विचारतोय
ज्या वेगाने मराठवाड्याचा दुष्काळ संपुष्टात आणण्याहेतू काम करावयाचे आहे त्या वेगाने सरकार काम करत आहे का? तुम्ही मराठवाड्याला अश्वस्थ केलं, दुष्काळी मनांना ओलावा दिला, परंतू प्रत्यक्षात आज मितीला मराठवाड्याची स्थिती काय आहे? कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो महत्त्वकांक्षी आहे. या योजनेद्वारे कृष्णा नदीखोर्यातील सुमारे 23.66 टीएमसी पाणी धाराशिवसह मराठवाड्यातील दुष्काळी भागात वळवण्याचा शुद्ध हेतू आहे परंतू या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यात गती देण्यासाठी ऑगस्टमध्ये 6 हजार 477 कोटी पाचवी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली परंतू हिच मान्यता गेल्या आठ दहा वर्षांपूर्वी दिली असती तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती. उल्हास नदी खोरे व नदीजोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत हे, उल्हास खोर्यातील सुमारे 78 टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला मिळू शकते. हे सर्व कागदावर दिसतं, प्रत्यक्षात कामांना वेग दिसत नाही. टिका करायची म्हणून आम्ही टिका करणार नाहीत परंतू मराठवाडा हा वस्तूनिष्ठ दुष्काळवाडा झालाय. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि त्यावरची कामे हे जलदगतीने व्हायला हवेत. होय, मुख्यमंत्री साहेब! आत्ता खरी गरज आहे ती शेतकर्यांच्या प्रत्येक मागणीवर उत्तर शोधण्याची आणि ती तात्काळ पुर्ण करण्याची. एकदा मराठवाड्यात फिरा, वाडी-वस्ती तांड्यावर जा आणि मग पहा, आजचा शेतकरी हा किती मरणयातना सहन करतोय.
हेलिकॉप्टरमधला दुष्काळ
एसीच्या दालनात बसून आणि हेलिकॉप्टर मधून पिक पाहून दुष्काळाची समिक्षा होत नसते. दुष्काळ समजून घ्यायचा असेल तर एखाद्या शेतकर्याच्या शेतात उभा रहा, त्याच्या कोरड्या विहीरीत डोकावून पहा, त्याच्या गोठ्यात चार्यासाठी हंबरडा फोडणारी जनावरे पहा आणि मग त्याला हळूच विचारा, काय परिस्थिती आहे. उत्तर शब्दात मिळणार नाही, त्या शेतकर्याच्या डोळ्यात पहा, त्याच्या डोळ्यात त्याचं उभं आयुष्य, त्याची मेहनत, त्याचे दारिद्य्र, त्याचे लेकरं बाळं, त्याचे वृद्ध आई-बाप आणि त्या शेतकर्याचे भविष्य त्याच्या डोळ्यात दिसेल. मराठवाड्याला दुष्काळ नवा नाही, प्रत्येक दोन तीन वर्षांनी दुष्काळ येतो, सरकार पाहणी करतयं, समित्या येतात, अहवाल तयार होतात, मदतीच्या घोषणा होतात आणि काही दिवसांनी सगळे विसरले जाते. पुन्हा पुढच्या वर्षी त्याच शेतकर्याच्या पदरी तिच
चिंता असते
आणि तिच चिता
असते. पावसाचे आपल्या हातात नाही हे खरे परंतू पावसाचे पाणी आडवणे, जलसंधारण करणे, सिंचन वाढवणे, चारा नियोजन करणे, पिकांचे नियोजन करणे, विम्याची भरपाई वेळेत देणे, संकटाच्या काळात शेतकर्यांच्या हातात रोख मदत पोहोचविणे हे तर सरकारच्या हातात आहे ना! मग नेमकी अडचण का येते? यंत्रणा? नियोजन? की इच्छा शक्ती सरकारची नसते? आज शेतकर्याला भाषण नको, त्याला घोषणाही नकोयत, त्याला हवे आहे पाणी, चारा, पिकाची नुकसानभरपाई, पिका विमा हवाय, कर्जाच्या ओझ्यातून त्याला दिलासा हवाय. पाऊस गेला की पिक वाचत नाही. पिक गेलं की उत्पन्न राहत नाहीत, उत्पन्न गेलं की कर्ज वाढते, कर्ज वाढले की मानसिक तान वाढतो आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याची संपुर्ण किंमत त्या शेतकर्याच्या कुटुंबाला मोजावी लागते. म्हणूनच आता दुष्काळाकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहण्याची वेळ आता संपली आहे, दुष्काळ म्हणजे आर्थिक आपत्ती आहे, सामाजिक आपत्ती आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील तो सर्वात मोठा आघात आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय, शेतकरी वाचला तर गाव वाचेल, गाव वाचले तर बाजारपेठ वाचेल आणि बाजारपेठ वाचली तर जिल्ह्याची अर्थव्यवस्था चालेल, म्हणून दुष्काळग्रस्त भागाकडे मदतीचा हात पुढे करणे ही सरकारची कृपा नाही, तो शेतकर्यांचा हक्क आहे. त्यामुळे बैठका, फोटो, पंचनामे यावर वेळ घालण्यापेक्षा शेतकर्यांना थेट मदत करा आणि मराठवाड्यातले सिंचनाचे कामे जलदगतीने पुर्ण:त्वास न्या.












