वडवणी, /ऑनलाईन रिपोर्टर
शहरातील बाजारपेठेत गाडी लावण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने वडवणी शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेत काही जण जखमी झाल्याचा दावा करण्यात येत असून, घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही काळातच दोन्ही बाजूंकडील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर वाद वाढत जाऊन दगडफेक सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत काही जणांना मार लागल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई करून संबंधितांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी शेकडो नागरिक वडवणी पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. संतप्त जमावाने पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्याने अफवांना पेव फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वाद नेमका कोणत्या कारणातून वाढला, दगडफेकीत कोण सहभागी होते आणि जखमींची संख्या किती आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. अधिकृत पोलिस माहिती आणि पुढील कारवाईनंतर घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.










