बीड (रिपोर्टर) पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडलेल्या हातापायातील बेड्या काढता याव्यात, मनगटातलं बळ काढतानाच स्वाभिमान जागृत व्हावा, पांढरतोंड्या इंग्रजांविरोधात अंत:करणात निर्माण झालेली चिड उफळून यावी, यासाठी एकीचे बळ महत्वाचे होते. फोडा आणि तोडा च्या राजकीय खेळीत इंग्रजांनी आपले पाय अखंड हिंदूस्तानच्या हृदयात रोवून ठेवले होते. अशा वेळी अहिंसेपासून क्रांतीपर्यंत, संस्कारापासून सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत जो तो स्वातंत्र्याने भारावून गेला होता.
त्याचवेळी लोकमान्य टिळकांनी एकीचे बळ निर्माण व्हावे यासाठी गणेश उत्सवाच्या माध्यमातून स्वाभिमान जागृत करण्या हेतू संस्काराची पायाभरणी करत संस्कृती जतन करणे हा प्रमुख उद्देश ठेवला. आजच्या स्वतंत्र भारतात पारतंत्र्याचे साखळदंड नसले तरी संस्कार आणि संस्कृतीचा ठेवा जपण्या हेतू परळीत गेल्या 17 वर्षांपासून धनंजय मुंडे नावाच्या नेतृत्वाने संस्काराचं धन पेरत गणेश उत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीचा जयजयकार सुरू ठेवला. धनंजय मुंडेंच्या या वैद्यनाथ गणेश महोत्सवाला राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भेट देण्यासाठी लोक येतायत.
12 ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या परळीला देशाच्या पाठिवर प्रभू वैद्यनाथाने आधीच ओळख दिली आहे. प्रभू वैद्यनाथाच्या या पावनभूमीत संस्काराचं धन आणि संस्कृतीचा जयजयकार होणे नितांत गरजेचं आहे. मग राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षांपासून धनंजय मुंडे हे नेतृत्व करत असताना श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाची निर्मिती करत या माध्यमातून मुंडेंनी एकीचे बळ दाखवण्या हेतू अनेक कार्यक्रम सुरू ठेवले. नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ते अनन्यसाधारण महत्व देत आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते मंत्री, विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारलेल्या या तरण्याबांड नेतृत्वाने गेल्या दोन दशकाच्या कालखंडात परळीकरांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले आहे. खेळ असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो अथवा सामाजिक कार्यक्रम असो, नाथ प्रतिष्ठाण आणि धनंजय मुंडे हे अग्रेसरपणे ते कार्यक्रम घेत यशस्वी करून कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकहिताचे संदेश देत आले आहेत. धनंजय मुंडेंचा कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांपासून प्रेक्षकांपर्यंत एक पर्वणीचा क्षण असतो. यावर्षीही श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या हेतूने धनंजय मुंडेंनी या दहा दिवसांच्या कालखंडात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवली आहे. आज 31 ऑगस्टपासून 8 सप्टेंबरपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम करताना वेगवेगळ्या श्रोत्यांसह प्रेक्षकांची दखल मुंडेंनी घेतल्याचे दिसते. कव्वालीचा मुकाबला असेल, अजय-अतुल यांचे संगीत आणि गायन असेल, अमृता खानविलकरांची विशेष हजेरी आणि महाराष्ट्र हास्य जत्रेचा हास्य कल्लोड, लावणीचा जल्लोष, चला हवा येऊ द्या चे अंतर्मुख करणारे नाट्य, भीम गितांचा कार्यक्रम आणि इंदूरीकरांचं कीर्तन, निवडलेले कार्यक्रम पाहितल्यानंतर समाजप्रबोधन कशातून होते, समाजाची जागृती कुठल्या गितातून, कुठल्या पोवाड्यातून आणि कुठल्या कार्यक्रमातून होते हे धनंजय मुंडेंना चांगलं ठाऊक असल्याचे अनेक वेळा निदर्शनास येतं. यावर्षीही धनंजय मुंडेंचा हा कार्यक्रम वाह क्या बात क्या बात! म्हणण्यासारखा म्हणावा लागेल. प्रामुख्याने इथे लोकांना काय हवय, प्रबोधन कशातून होतय हे धनंजय मुंडेंना ओळखून चुकलय. म्हणूनच आज ते आज ‘लोकनाथ’ होतायत. परळीचा गणेशोत्सव हा राज्यात आणि देशात आपलं लक्ष केंद्रित करणारा ठरणार हे नक्की.