‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांनी तर परळीत मुंडेंच्या निवासस्थानी श्रीची स्थापना
धनंजय मुंडे म्हणाले, विघ्नहर्ता महाराष्ट्रावरील सर्व नैसर्गिक संकटे दूर कर
बीड (रिपोर्टर) कोरोनाचे विघ्न दूर झाल्यानंतर सुखकर्ता-दुखहर्ता असलेला विघ्नहर्त्या श्रीगणेशाची स्थापना आज भक्तीभावाने घरोघरी होत असून होत असून ढोल-ताश्यांच्या निनादात टाळमृदंगाच्या गजरात ‘गणपती बप्पा मोरया’च्या जयघोषात गुलालाची उधळण करत श्रीचे घरोघरी मनोभावाने स्वागत होत आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांनीही मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापना केल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी श्री स्थापना करून भक्तीभावाने आरती केली. परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी श्रीची स्थापना झाली. या वेळी धनंजय मुंडे यांनी सपत्नीक गणेशा आरती केली. जिल्ह्यात 1 हजार 498 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
गेले दोन-तीन वर्षे कोरोनाच्या महामारीच्या विघ्नाने गणेशोत्सवा-बरोबर अन्य उत्सवांवरही विरजन आले होते. या वर्षी राज्यभरात गणेशोत्सव निर्बंधाशिवाय करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे गणेशोत्सवाला आनंदोत्सवाचे स्वरुप प्राप्त होत असून बीडसह आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, वडवणी, धारूरसह जिल्हाभरातील गावांगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळांनी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असून आज श्री स्थापनेदरम्यान दुपारपर्यंत अनेक ठिकाणी श्रीची स्थापना भक्तीभावाने झाली होती. विघ्नहर्त्याला घरी घेऊन जाण्यासाठी बाजारपेठामध्ये अबालवृद्धांची गर्दी उसळली होती. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बप्पा मोरया’ चा जयघोष रस्त्या रस्त्यावर ऐकावयास मिळत होता. छोट्या मुर्त्यांपासून पाच ते आठ फुट गणेशाची मूर्ती बाजारपेठांमध्ये पहावयास मिळत होत्या. अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेशाचं स्वागत करण्यात आलं. घरोघरी गणेशाच्या स्वागतासाठी सडा सारवनासह रांगोळी काढण्यात आल्या होत्या. इकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी श्रीची स्थापना करत सपत्नीक आरती केली. इकडे परळी येथे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या निवासस्थानी श्रीची स्थापना करत सपत्नीक आरती केली. या वेळी धनंजय मुंडे यांनी कोविडनंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून गणरायाच्या आगमनाने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरीकांना सुख-संपत्ती व शांती लाभो, हाराष्ट्रातील सर्व नैसर्गिक संकटे दूर व्हावेत, अशी प्रार्थना या वेळी मुंडेंनी श्रीच्या चरणी केली.