बीड (रिपोर्टर) कालपासून बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आणि सदस्यांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काल पहिल्या दिवशी केवळ सरपंचपदासाठी 65 जणांचेच उमेदवार आले होते. ही प्रक्रिया गुरुवारी आणि शुक्रवारी वेग घेईल, असे तहसीलदार हजारे यांनी सांगितले.
दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. गावपातळीवर सरपंच पदाचे उमेदवार ठरवणे, आणि बिनविरोध ग्रामपंचायत काढता येती का यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत गावपुढारी बैठकांचा जोर लावत आहेत. शेवटी विरोधी पार्टीने पॅनल टाकलाच तर आपलाही पॅनल असावा यासाठी अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत. कालपर्यंत केवळ 11 तालुक्यातून 65 जणांनीच सरपंच पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. काल आणि आज सरपंच आणि सदस्य यापदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होताना दिसत नाही. शेवटच्या दोन दिवसात हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील 85 ग्रामपंचायत, आष्टी तालुक्यात 104 ग्रा.पं., बीड तालुक्यात 132, धारूरमध्ये 31, गेवराईमध्ये 76, केजमध्ये 66, माजलगावमध्ये 44, परळीमध्ये 80 पाटोदा 34, शिरूर 24 आणि वडवणी तालुक्यात 25 अशा पद्धतीने ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.