मुंबई (रिपोर्टर) प्रतापगडावर आज कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना थेट एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली जात आहे.
आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजित आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे.पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, आज प्रतापगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणारे मुख्यमंत्री राज्यपालांच्या विरोधात एक शब्दही बोलत नाहीत. राज्यपालांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्याची वेळ येणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. किंबहुना या राज्यपालांना वाचवण्यासाठीच तर भाजपच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी सीमा वाद निर्माण केला नाही ना, अशीही शंका येते.