बीड (रिपोर्टर) लग्नाळू मुलाला गळ घालून लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बीड शहर पोलिसांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच अशा टोळीचा पर्दाफाश केला होता. तोच दुसरी घटना नेकनूर ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे. जवळच्या मित्राने ठेपा आणला, लग्नही झाले, नवरी सासरी आली, अर्ध्या तासाने मला बाथरुमला जायचे म्हणून बाहेर पडली ती परत आलीच नाही.
तानाजी भारत जोगदंड (वय 28, रा. देवी बाभुळगाव ता. जि. बीड) याने नेकनूर पोलिसात फिर्याद दिल्याने नवरी मुलीसह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बाभुळगाव येथील तानाजी जोगदंड याला त्याच्याच जवळचा मित्र लक्ष्मण युवराज ढास याने लग्नासाठी ठेपा आणला होता. मात्र नवरीच्या आईला दोन लाख रुपये देऊन लग्न लावावा लागेल, असे सांगितले होते. तानाजी जोगदंड याने 10 हजार रुपये फोन पे केले तर लग्नाच्या दिवशी 1 लाख 90 हजार रुपये कॅश नवरीच्या घरच्यांना दिले. तर लग्नात 7 ग्रॅमचे झुंबर आणि 13 ग्रॅमचे मणिमंगळसुत्र घातले होते. दोघांचे लग्न गंगामसला (ता. माजलगाव) येथे 20 नोव्हेंबर रोजी झाले. त्याच रात्री नवरी मुलीला घेऊन नवरदेव आपल्या देवीबाभुळगाव येथे आला. अवघ्या अर्ध्या तासात नवरी म्हणाली, की मला बाथारुमला जायचे आहे, असे म्हणून अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह जशी ती बाहेर पडली तशी आलीच (पान 7 वर)
नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तानाजी जोगदंड याने काल नेकनूर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण युवराज ढास, प्रिया युवराज ढास (दो.रा. घारगाव ता. बीड), शितल भीमराव धुमाळ (रा. पिंप्री राजा, जि. औरंगाबाद) व तिची आई, मावसभाऊ यांच्यावर कलम 420, 423, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.