गणेश सावंत
मो. नं. 9422742810
अखंड जगाला फक्त भूगोल आहे. परंतु जगाच्या पाठीवर महाराष्ट्र असा एक प्रदेश आहे ज्या प्रदेशाला भुगोलाबरोबर जाज्वल्य इतिहासाची देण आहे. येथे ज्ञान आहे, शिक्षण आहे. परिवर्तनाचे धोरण आहे. सत्य-असत्याचे आणि त्यागाचे वचन आहे. इथे धर्म आहे, इथे देश आहे, इथे स्वाभिमान आहे, म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश देशाला आजपर्यंत दिशा देत आला आहे. ही भूमी संत-महात्म्यांची, समाज सुधारकांची, क्रांतीकार्यांची. म्हणूनच या भूमीला देशाच्याच नव्हेतर जगाच्या व्यासपीठावर ज्ञानपीठाची भूमी म्हणून गणले जाते. मात्र याच भूमीत निपजलेले आजकालचे काही तथाकथीत धर्मरक्षक व्यक्तीपुजेच्या नशेत महाराष्ट्राची जडणघडण करणार्या महामानवांविरोधात अपशब्द काढतात तेव्हा ज्ञानपीठाच्या या भूमीत असे भिकारचोट निपजलेच कसे?हा प्रश्न आम्हालाच नाही तर जगाच्या पाठीवर कुंच्याही माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉ साहेब, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात सातत्याने अपशब्द भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राज्यपालासह भाजपाच्या अशिक्षीत नेत्यांनी काढले. यापुढे जात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाने जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणासाठी भीक मागत होते असे वक्तव्य केले तेव्हा राज्यभरात संतापाचा लाव्हा रस उसळणे साहजिक आहे. त्यांच्या भिकारचोट वक्तव्याचा समाचार घेणेही क्रमप्राप्त आहे. या ज्ञानपीठाच्या भूमीतल्या भिकारचोटांबाबत भाष्य ते काय करावे? असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा ‘तुका म्हणे ऐश्या नरा, मोजुनी माराव्या पैजरा’ ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते.
दान आणि भीक
याच्यातला मतितार्थ जर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कळत नसेल तर एकतर त्यांना अभ्यास नाही किंवा महाराष्ट्राच्या युगपुरुषांवर शिंतोडे उडवण्यासाठी घेतलेल्या सुपारीतून त्यांनी हे वक्तव्य केले असावे, जेव्हा एखादा व्यक्ती व्यक्तीपुजेच्या व्यासंगी लागतो तेव्हा अशा व्यक्तीला जगभरातले सर्वश्रेष्ठ हे तुच्छ वाटते आणि ज्याची पुजा तो करतो तो सर्वश्रेष्ठ वाटतो. इथेही तसेच झाले. चंद्रकांत पाटलांना अथवा भाजपाच्या नमो रुग्णांना एक व्यक्ती व्यतिरिक्त देशात अथवा जगभरात थोर कोणीच नाही असा यांना भास होतोय का? हा सवाल आता विचारावाच लागेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत राज्यपालापासून भाजपाच्या अन्य नेत्यांपर्यंत केले गेलेले वक्तव्य आणि चंद्रकांत पाटलांनी डॉ. आंबेडकर, फुले आणि कर्मवीरांबाबत केलेले वक्तव्य हे माफीजोगे नाही. दान कशाला म्हणायचं, भीक कशाला म्हणायची याचे भान जर राज्यात सर्वोच्च पदावर राजकारण करणार्या व्यक्तीला नसेल तर त्या व्यक्तीसारखा अर्धज्ञानी दळभद्री कोणीच नसेल. चंदक्रांत पाटलांच्या मते फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी शिक्षणासारखे पवित्र ज्ञानार्जन सर्वसामान्यांना देण्यासाठी झोळी पसरवून भीक मागितली. अरे सोडा, उभं आयुष्य सर्वसामान्यांसाठी झिजवणारे कर्मवीर असोत, फुले असोत यांची श्रीमंती काय होती हे तरी चंद्रकांत पाटलांना माहित आहे का? त्यांच्या श्रीमंतीतून त्यांनी जे सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षणाचे दारे खुले करताना आपला खजीना रिकामा केला त्याला दानत म्हणतात.
फुले-कर्मवीरांची दानत
सांगण्याची गरज नाही. बहुदा नव्हे नव्हे तर ते सांगण्याची आमची तेवढी उंचीही नाही. परंतु जेव्हा वाचाळवीर बडबडतात तेव्हा त्यांचे त्वांड रंगवण इरादे भाष्य करावेच लागेल. शिक्षणाचे दारे सर्वसामान्यांना खुले व्हावेत यासाठी मात्मा फुलेंनी तर आपले सर्वस्व लोकांच्या पदरात अर्पण केले. अठराव्या शतकामध्ये जिथे शिक्षण, ज्ञान आणि वाचन हे सर्वसामान्य आणि उच्चवर्णीयांच्या मते क्षुद्रांना करणे म्हणजे पाप होते. तेव्हा आपल्याकडील सर्व वित्त फुलेंनी खर्च केले. तर कर्मवीरांनी 103 वर्षांपुर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत शिक्षण हेच समाजाचे परिवर्तनाचे साधन आहे ही दूरदृष्टी ठेवत मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. किर्लोस्कर, ओगले, कपूर या कंपनींमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काम केले आणि या कामातून त्यांना जे उत्पन्न मिळाले ते उत्पन्न शेतीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न किर्लोस्कर कंपनीत असलेले शेअर्स, आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी लक्ष्मीबाई यांच्या माहेराकडून मिळालेले शंभर तोळे सोने त्यात मंगळसुत्र सुद्धा भाऊरावांनी विद्याार्थ्यांसाठी खर्च केेले याला दानत म्हणतात आणि भिकेची भाषा करणार्या चंद्रकांत पाटलांना आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते जेव्हा कर्मवीर पाटलांची शाळा अडचणीत आली तेव्हा एका शेठने शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथे माझं नाव लावा, मी दोन लाख रुपये देतो, जेव्हा असं म्हटलं तेव्हा बाणीदारपणे भाऊरावांनी एकवेळेस मी माझ्या बापाचे नाव बदलेल परंतू शाळेला दिलेलं छत्रपतींचं नाव बदलणार नाही, असे ठणकावून सांगितले. आजचे पाटलातले चंद्रकांत त्यांना भीक मागे ठरवतात तेव्हा भाऊरावांचं ब्रिद ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद’ याची आठवण करून द्यावीशी वाटते. सातारच्या रयत शिक्षण संस्थेने चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रेसनोट काढून भाऊरावांची भूमिका, त्यांनी केलेला खर्च आणि त्या वक्तव्याचा निषेध उभ्या देशभरात केला आहे.
हा महाराष्ट्र
दर्याखोर्यांचा, सह्याद्रीचा, निधड्या छातीचा, स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा आणि सळसळ्या मनगटाचा नक्कीच होता, आहे आणि राहील. परंतु शिक्षणासारख्या पवित्र ज्ञानार्जनत उच्चवर्णीय वगळता अन्य कुठल्याही व्यक्तीला जाण्याची परवानगी नव्हती आणि तिथेच या महात्म्यांनी बंडाचे निशान फडकावले. सुरुवात झाली ती राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या सोन्याच्या नांगरापासून ती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेपर्यंत. या कार्यकाळामध्ये अनेक महात्म्ये, शिक्षणप्रेमी सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावायचे. लोक शिकावेत, जागृक व्हावेत म्हणून सर्वात मोठा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ते म्हणाले, ‘शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे तो जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या पुढे जात शिक्षणाबाबत ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय. ही धारणा आणि शिक्षण देण्याबाबतचे ध्येय आजच्या व्यक्तीपुजीत भिकारचोटांना कळणार तरी कसे? परंतु अशा व्यक्तीपुजक व्यक्तींच्या वक्तव्याचा संताप नक्कीच आहे आणि तो संताप जेव्हा उफळून येतो तेव्हा अशा व्यक्तींचे
तोंड काळे
होते. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यामध्ये नक्कीच कायदा हातात घेणे हा गुन्हा आहे. चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर फेकलेल्या शाईचे आम्हीही लोकशाहीच्या राज्यात राहतो म्हणून समर्थन करणार नाही. परंतु काल घडलेल्या घटनेनंतर आणि त्यापुर्वी भाजपाच्या व्यक्तीपुजक लोकांकडून महात्म्यांचे झालेले अपमान पाहता त्या घटनेचं समर्थन राज्यभरात होतय, हे सत्यही नाकारता येणार नाही. ज्ञानगंगा असलेल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ही ज्ञानगंगा उभारली त्या उभयस्थानांवर हल्ले होत असतील, त्यांचा सातत्याने अपमान केला जात असेल तर अशा घटना वाढतील यातही तिळमात्र शंका नाही. भाजपाकडून सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत जे वक्तव्ये होत आहेत ते वक्तव्य तळपायाची आग मस्तकात घेऊन जाणारे आहेत. शिशूपालाची जेव्हा शंभरी भरली तेव्हा त्याचा वध झाला. कालचे शाईफेक प्रकरण भारतीय जनता पार्टीतील वाचाळवीरांचे शंभरी भरतीकडील झालेली वाटचाल म्हणावी लागेल. दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यात शिक्षणासाठी सरकारच्या अनुदानावर का अवलंबून राहायचं हे वक्तव्य खासगी शिक्षणाला पोशक आणि सरकारी यंत्रणेकडून जिल्हा परिषदेच्या शाळे ज्या बंद करण्यात येत आहेत त्यातून भाजपाचे शैक्षणिक धोरण हे खासगीकरणाकडे वळतय हे सिद्धीस नेणारं आहे.