कुठे हसू कुठे आँसू
परळीत धनंजय मुंडे, बीडमध्ये क्षीरसागरच, गेवराईत अमरसिंह पंडितांचा दबदबा, माजलगावात दादागिरी नाथ्रा धनंजय मुंडेंचेच तर नवगण राजुरी संदीप क्षीरसागरांची, पिंपळनेर सतीश पाटलांचे, साक्षाळपिंप्री जयदत्त क्षीरसागरांकडे
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून) – जिल्ह्यातील 704 पैकी 671 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मोजणी तालुक्याच्या ठिकाणी सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती आले तेव्हा काही मतब्बरांना मतदारांनी झटके दिले तर काहींना पुन्हा सत्ता हाती दिली. परळी तालुक्यात माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या गटाच्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडून आल्या. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 28 ग्रामपंचायतींवर या ठिकाणी विजय मिळवता आला तर भाजपाला केवळ 12 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. नाथ्रा ग्रामपंचायत पुन्हा धनंजय मुंडेंच्या ताब्यात आली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे हे 648 मतांनी विजयी झाले आहेत. बीड तालुक्यातल्या बहुचर्चित नवगण राजुरी ग्रामपंचायत आ. संदीप क्षीरसागरांच्या ताब्यात आली. त्याठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना जोर का झटका देण्यात आला. तर इकडे पिंपळनेर पुन्हा एकदा सतीश पाटील यांचेच असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. त्याठिकाणी सतीश पाटील यांच्या सुनबाई सुलभा मनोज पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. बीड तालुक्यात भाजपाकडेही 6 ते 7 ग्रामपंचायती ताब्यात आल्याचे दिसून येते. या ठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नेतृत्व केले होते. माजलगाव तालुक्यात अशोक डकांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परंतु विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचा तालुक्यावरचा प्रभाव पुपन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवरून दिसून आला आहे.