बीड (रिपोर्टर) लोकसभा, विधानसभा निवडणुकीची पायाभरणी म्हणून ज्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहितलं जातं ती पायाभरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी मजबूत केल्याचे कालच्या ग्रा.पं. निकालातून दिसून आले असून राजेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ग्रा.पं. निवडणुकीत जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आणल्या असून अन्य धारूर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर या ठिकाणीही राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायती तुल्यबळ निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर ठरला आहे. राजेश्वर चव्हाण यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत हे यश मानाचा तुरा म्हणून चर्चेत येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात प्रतिस्पर्धी भाजपाची धूळधाण करण्यासाठी आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व दिलं होतं. जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळावं यासाठी प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते. लोकसभा-विधानसभा निवडणुकीचा पाया मजबूत होण्याइरादे अखेर राजेश्वर चव्हाण यांना यश आल्याचे दिसून येते. काल झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. परळी, गेवराई, माजलगाव, बीड, अंबाजोगाई, केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर राहिल्याचे दिसून येते. तर अन्य तालुक्यातही राष्ट्रवादी तुल्यबळ पहावयास मिळत असून मतदान झालेल्या साडेसहाशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींपैकी चारशेच्या वर ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याने राजेश्वर चव्हाण यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून केलेले काम पक्षामध्ये महत्वपुर्ण मानले जात आहे.