नवी दिल्ली (वृत्तसेवा) अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
आज दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना अनिल देसाई यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. सत्तासंघर्षाच्या पहिल्या सुनावणीपासून खासदार अनिल देसाई हे सुप्रीम कोर्टात हजर राहत आहे. ठाकरे गटाची न्यायालयीन आणि निवडणूक आयोगासमोरील लढाईची धुरा उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांच्याकडेच सोपवली आहे. त्यामुळे सुनावणीच्या निकालाबाबत त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.
आज पत्रकार परिषदेत खासदार अनिल देसाई म्हणाले, आज सुनावणीच्या तिसर्या दिवशी ठाकरे गटाकडून अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि अॅड. दत्ता कामत हेच युक्तिवाद करणार आहे. आज संपूर्ण दिवस ठाकरे गटाचाच युक्तिवाद होईल. त्यानंतर शनिवार, रविवार सुप्रीम कोर्टाला सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपासून पुन्हा घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होईल. साधारण पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील. त्यानंतर लगेच घटनापीठ निकाल देणार नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात निकाल येण्याची शक्यता फार कमी आहे.
पुढे खासदार अनिल देसाई म्हणाले, शिंदे गटाने बाजू मांडल्यानंतरही घटनापीठ लगेच निकाल देणार नाही. फेब्रुवारीचा महिना यातच संपून जाईल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात निकाल येऊ शकतो. मात्र, शिंदे गटाने पुढील आठवड्यात त्यांचा युक्तिवाद पूर्ण करावा. आणखी वेळ मागितल्यास सुनावणी लांबेल. तसेच, दोन्ही गटांचे एकमेकांच्या युक्तिवादावर समाधान झाल्यानंतरच सुनावणी पूर्ण झाली, असे म्हणता येईल. कोणी आक्षेप घेतल्यास त्यावर बाजू मांडण्यासाठी पुन्हा वेळ जाईल. त्यामुळे निकाल लांबू शकतो, असेही खासदार अनिल देसाई म्हणाले.
खासदार अनिल देसाई म्हणाले, शिंदे गटाच्या बंडामुळे लोकशाहीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकशाहीसाठी सत्तासंघर्षाची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. बंडखोर 16 आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी आम्ही केली आहे. आम्हाला न्याय नक्की मिळेल, अशी अपेक्षाही अनिल देसाई यांनी व्यक्त केली.