बीड (रिपोर्टर) शेतीमालाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने झोडपले, त्यात गारपिटीने शेतातील उभे पीक उद्ध्वस्त केले. अशा परिस्थितीत शेतकर्यांना मदत द्या, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेलेल्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसंग्रामच्या पदाधिकार्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्यांच्या वागणुकीवर तीव्र आक्षेप घेत संतप्त होऊन बोलण्यास (पान 7 वर)
सुरुवात केली. यामुळे काही काळ याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी अडचणीत असताना प्रशासनातील अधिकारी अशी मुजोरपणाची वागणूक देत असतील तर शिवसंग्राम हे खपवून घेणार नाही, असा इशारा प्रभाकर कोलंगडे अप्पा यांनी दिला.
आज दुपारी शिवसंग्रामचे नेते प्रभाकर अप्पा कोलंगडे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, त्याठिकाणी ते निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या कॅबिनमध्ये गेलेे असता राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दरडावून बाहेर थांबण्याचे सांगितले, एवढेच नाही तर तुमचे निवेदन तहसीलदारांकडे द्या, असेही म्हटले. राऊत यांची भाषाशैली ही मुजोर आणि मस्तवालपणाची दिसून आल्यानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते अधिकच संतापले आणि राऊत यांच्यावर भडकत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे संप चालू आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांचे कामे होत नसताना वरिष्ठ अधिकारीही बाबुगिरी करत असतील तर हे संतापजनक असल्याचे सांगत अधिकार्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे म्हणत शिवसंग्रामचे नेते कोलंगडे अप्पा यांनी शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत शासन व्यवस्थेने द्यावी, त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, असेही कोलंगडे अप्पा यांनी म्हटले.
शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत करा -शिवसंग्राम
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसापासून अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाल्याने रस्त्यांसह शेतांमध्ये गारांचा खच साचला होता. त्यामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकर्याच्या काढणीस आलेल्या गहू, हरभरा ज्वारी, कांदा या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे तसेच आंबा, मोसंबी ,पपई, द्राक्ष ,टरबूज इत्यादी फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
खरीप हंगामातील अतिवृष्टीने शेतकर्यांच्या पिकाचे नुकसान झालेलं होते त्या नुकसानीची भरपाई अजून शेतकर्याना मिळालेली नाही. कापूस,कांदा व हरभरा या पिकास भाव नसल्याने शेतकर्याच्या घरात तो तसाच पडून आहे यामुळे शेतकर्यास (पान 7 वर)
आसमानी व सुलतानी दोन्ही संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकार अशा संकटात शेतकर्यांच्या मदतीला धावून येईल अशी आशा आहे त्यामुळे गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामे करून तात्काळ हेक्टरी मदत शेतकर्याच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी बीड जिल्हा शिवसंग्रामच्यावतीने मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकार्या मार्फत करण्यात आली आहे. या वेळी भारतीय संग्राम परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे,शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, युवक जिल्हाध्यक्ष रामहोरी मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,ऊसतोड कामगार नेते बबनराव माने एडवोकेट राहुल मस्के, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट मनीषाताई कुपकर, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष फेरोज पठाण, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम नेते सुहास पाटील मनोज जाधव, शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, युवक आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत डोरले, महिला आघाडीच्या शिरो उपाध्यक्ष संगीताताई ठोसर,सुवर्णा दरेकर, पिंपळनेर सर्कल प्रमुख गोपीनाथ घुमरे, पालीचे सर्कल प्रमुख एडवोकेट गणेश मोरे, नाळवंडी गणप्रमुख सीताराम घुमरे, शेख कुतुब भाई हरिश्चंद्र ठोसर पांडुरंग बहिर, यांच्यासहाम पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.