बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून)- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सराटे अंतरवलीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील मराठ्यांनी आज जिल्ह्यात चक्काजाम केला. गेवराईत रात्री आंदोलकांनी बसस्थानकात बस जाळली. तर बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी शहरांसह तालुक्यातील अन्य गावांमध्ये आंदोलकांनी रस्ते रोखून धरले. अनेक ठिकाणी दोन तासापेक्षा जास्त रास्ता रोको आंदोलन सुरू राहिल्याने जिल्हाभरातील वाहतूक ठप्प झाली होती. धुळे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी आंदोलने पहावयास मिळाली. बीड-नगर, बीड-परळी, मांजरसुंबा – लातूर, गढी-माजलगाव, पाडळसिंगी-नगर यासह अन्य राज्य महामार्ग आंदोलकांनी रोखून धरले होते. आंदोलकांनी अनेक ठिकाणी अॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी रस्ते दिले. या चक्काजामने वाहतूक ठप्प झालेली असली तरी या आंदोलनातून आरक्षणाबाबतचा मराठ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा दिसून आला.
बीड शहरामध्ये आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका, महालक्ष्मी चौक बायपास रोड, नगनारायण चौक चर्हाटा फाटा, चौसाळा, मांजरसुंबा, लिंबागणेश, पाली, कोळवाडी, पेंडगाव, रौळसगाव, म्हाळसजवळा, घाटसावळी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. बीड तालुक्यातील या प्रमुख गावांनी महामार्गांसह अन्य ग्रामीण भागातले मुख्य रस्ते रोखून धरले. त्यामुळे काही ठिकाणी दोन तास तर काही ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले. जिल्ह्यातल्या अन्य आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी, माजलगाव या तालुक्यांच्या ठिकाणीही मोठमोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांचा संताप पाहता बससेवा पुर्णत: बंद ठेवण्यात आलेली होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही प्रमुख मागणी लावून धरत गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना या चक्काजाममधून बीड जिल्ह्यातील मराठा समाजाने पाठींबा दिचला. हा चक्काजाम मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.