गेवराई (रिपोर्टर) गेल्या या दिवसापासून जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज बीड जिल्ह्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. याच धर्तीवर गेवराई तालुक्यातही विविध ठिकाणी हे आंदोलन संपन्न झाले. दरण्यां गेवराई शहरातील मराठा समाज बांधवांनी सकाळी 10 वजता छत्रपती संभाजी महाराज चौक बायपास रोड येथे जवळपास दोन तास चक्काजाम आंदोलन केले.
दरम्यान या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडत सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. त्याच बरोबर तालुक्यातील मादळमोही, गढी, सिरसदेवी फाटा, पाडळसिंगी, तलवाडा, जातेगाव फाटा, अर्धमसला, राक्षसभुवन फाटा, खांडवी फाटा, सिरसदेवी, लोणाळा फाटा यासह महामार्गावरील जवळपास सर्वच गावात ठिकठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी सर्व मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सरकारच्या विरोधात घोषणा प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला व आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी शांत संयमी आंदोलन करत आहोत त्याचा अंत पाहू नका, आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा पवित्रा घेत सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजात संताप व्यक्त होत असून सराटे अंतरवलीत पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर काही ठिकाणी आंदोलन हिंसक बनत चालले आहे. ठिकठिकाणी बसेसची जाळपोळही गेल्या आठवड्यात पहावयास मिळाली मात्र मध्यरात्री गेवराई बसस्थानकात एक बस जाळण्यात आली. 12.45 च्या दरम्यान संभाजीनगर-अहमदपूर (क्र. एम.एच. 20 बी.एल. 4908) ही गाडी बसस्थानकात आली होती. प्रवाशी खाली उतरल्यानंतर काहींनी बस पेटवून दिली. या आगीत बस पुर्णत: जळून खाक झाली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.