मॅराथॉन अग्रलेख भाग-1
‘‘जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. इतिहासात अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे’’ -महात्मा गांधी
हाडाचे गांधी अहंसेची आंधी
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
महात्मा मोहन करमचंद गांधी नावाचा चमत्कार येशू खिस्त, गौतम बुध्दानंतर हजारो वर्षांनी होऊन गेला. या माणसामध्ये असे नेमक काय होते, दीडशे वर्ष ज्या गोर्या माकडेंनी भारतीयांना कठपुतली सारखं नाचवलं, ज्या इंग्रजांनी अन्याय-अत्याचाराची परीसिमा गाठली. महिलांची अब्रु लुटली, सोन्याची चिडीया म्हणून ओळख असणार्या देशातल्या कान्या-कोपर्यातला ऐवज लुट्न नेला, त्या बंदुकीच्या जोरावर राज्य करणार्या इंग्रजांना ढुंगणाला पाय लावुन पळण्यास भाग पाडणारा हा माणुस होता तरी कसा? मोहन करमचंद गांधी या माणसाचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी सौराष्ट्रातील काठीवाडा प्रांतात पोरबंदर येथे झाला. जसे येशू खिस्त, गौतम बुध्द, श्रीकृष्ण जन्मजातच पराकोटी बुध्दीजिवी होते तसे मोहन करमचंद गांधी हे युध्दीजिवी नव्हते. माणसातला सर्वसाधारण माणुस, साधारण घरामध्ये जन्मलेलं एक साधं पोरं अशी ओळख गांधींची होती. शालेय जीवनामध्ये चोरी करणारा, मांस- मच्छी खाणारा, नव्हे नव्हे तर कस्तुरबासोबत विवाहबध्द असताना परदेशी वारीवर शिक्षणासाठी गेल्यानंतर मैत्रीणीसोबत रममणारा मोहन सर्व जिवनातले चढ-उतार आणि त्या चढ-उतारावर चालणारा सर्वसामान्य माणुस होता. गांधींचे सत्याचे प्रयोग जेव्हा वाचू तेव्हा गांधी काय होते, आणि गांधी काय झाले, हे सांगता येईल. सर्वसामान्य माणसाने अभेद ठरू पाहणार्या शक्तीला अक्षरश: अहिंसेच्या ताकतीवर झुकण्यास भाग पाडले. मग
त्या माणसाची
ताकत काय असेल?
महात्मा गांधी यांची अहिंसा ही शुरांची अहिंसा आहे. महात्मा गांधींची अहिंसा ही संयमाची, सचोटीची आणि कर्म-धर्माची अहिंसा आहे. गांधींची अहिंसा ही ‘एकला चलो रे’ च्या भुमिकेत सत्यासाठी झगडणारांची अहिंसा आहे. उंची पाच फुट वजन 114 पौड, दिसायला पुर्ण कुरूप, डोके मोठे, कान सुपासारखे, शरीराची हाडी दिसायची. केवळ एका पंचावर निघणारा हा 114 पौडांचा, हाडकुडा, काडीमोडी माणुस तेंव्हा 40 कोटी जनतेचं नेतृत्व करायचा. बंदुकीला बंदुकीने नव्हे तर हात जोडुन उत्तर देणारा जगाच्या पाठीवरचा हा पहिलाच माणुस असेल. जागतिक पातळीवर प्रत्येक दशक आणि शतकामध्ये अनेक स्थित्यांतरे घडतात. आजपर्यंतचा इतिहास पाहितला आणि स्थित्यांतराची पाने चाळली तर यामध्ये अनेक हौशे-नवशे, हुक्कीबाज, कर्तव्यदक्ष, राजे-महाराजे आणि राज्यकर्ते पहावयास मिळतील. गांधी हे एक असे सर्वसामान्य माणुस होते, ज्यांनी स्वाभिमानाने, सचोटीने आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून जगाला जिंकण्याची ताकद ठेवली होती. दिल्लीमध्ये सत्तेेचे सोहळे सुरु होते, तेंव्हा ते तप्त कलकत्त्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले होते, तेंव्हा सर्वांना वाटले गांधींचा खून होईल, ते वापस येऊ शकणार नाहीत. मात्र गांधी वापस आले. आम्हाला दुर्देव याचा वाटतं, या अहिंसेच्या देवतेचा खून एका मराठी माणसाच्या हातून लढवय्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात झाला. गांधी आपल्या सत्याच्या प्रयोगामध्ये जेवढ्या आपल्या चुका आणि सत्य घटना सांगतात तेंव्हा गाधींचे हिरो कोण ? हेही लक्षात येते. महात्मा गांधीचं जिवन हे आरश्यासारखं जसाचं तसं दाखवणारं होत. महात्मा होण्या अगोदर माणुस होणं किती गरजेचं आहे आणि माणसाचे हक्क मिळवून देणं हे माणसाचं किती आद्य कर्तव्य आहे हे गांधींना तेंव्हाचं कळलं. जेव्हा आफ्रिकेत रेल्वेमधुन प्रवास करताना, मस्तवाल गोर्या माकडाने जेव्हा गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यामधून खाली उतरायचे सांगितले. गांधी उतरले नाही म्हणून गांधींच्या सामानासह प्लॅटफार्मवरून ढकलून देण्यात आले. त्यावेळी गोर्या माकडाने ‘इंडियन्स अॅन्ड डॉग्स् ऑर नॉट अलाउट’ असं म्हणत, त्याने आपली क्रूरता सिध्द केली. इथं गांधींची तळ पायाची आग मस्तकाला नक्कीच गेली. मात्र या मस्तवालांचा निकाल मस्तकानेच लावावा लागेल, म्हणून गांधींनी कायद्यावर प्रचंड प्रमाणात अभ्यास केला आणि तेथूनच अन्यायाविरुद्ध लढण्याची चिड त्यांच्यात निर्माण झाली. सर्वप्रथम त्यांच्या या आंदोलनाला उभं करण्यासाठी आंदोलक म्हणुन मिळाल्या त्या कस्तुरबा. अशा या महात्म्याचा दुर्देवाने महाराष्ट्राच्या मातीमधल्या नत्थुरामामुळे अंत झाला. ज्या महाराष्ट्राच्या मातीमधल्या माणसाने गांधींवर गोळ्या झाडल्या,
तो माणुस होता तरी कोण ?
गांधींजी 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थना स्थळाकडे निघाले होते. हाडामासाच्या नव्हे तर नुसत्या हाडाच्या या जबरदस्त अहिंसेच्या ताकतीला हिंसेच्या वृत्तीने संपवण्याच्या भुमिकेत असलेल्या नथुराम गोडसेंनी गांधींना टार्गेट केले होते. दोन वेळेस गांधींना मारता आले नव्हते. त्या दिवशी जसेच गांधी प्रार्थना स्थळाकडे आले तसेच नत्थुराम पुढे सरकला, नमस्कार घातला आणि स्वतःच्या जवळील पिस्तूलाने गांधींवर गोळीबार केला. गांधी खाली कोसळले, तोंड्यातून आपसुक ‘हे राम’हा शब्दप्रयोग आला आणि या अहिंसेच्या योद्ध्याचा सायंकाळी 5:17 मिनिटाला अंत झाला. महात्मा गांधींची प्राणज्योत मावळली. त्यावेळी लोककवी मनमोहन म्हणाले
ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योत तारकांचा सुमन माला देव त्यांना अर्पिती
गांधीच कार्य, गाधींची ताकत, गांधींचे चारित्र्य, गांधींचे कर्म, गांधींचा धर्म हा केवळ आणि केवळ सत्य, अहिंसा हेच होते. हे सांगण्यासाठी कुठल्या शपथपत्राची नक्कीच गरज नाही. मात्र आज त्याच गांधींच्या देशामध्ये ‘एक रुपया चांदी का सारा देश गांधी का’ म्हणायची हिम्मत करू पाहणार्यांना आजचे सत्ताकेंद्र सर्रास देश द्रोहाचे सर्टिफिकेट देऊ पाहत आहेत. गांधी हा हाडा-मांसाचा माणूस त्याच्या कर्तव्य कर्माने महात्मा होतो, हे त्रिवार सत्य असले तरी जात-पात-धर्म-पंथाच्या नावावर सत्ता केंद्र हस्तगत करू पाहणारे जगदजेतेचे जेव्हा स्वप्न पाहतात तेव्हा गांधींच्या
सत्याच्या प्रयोगाची
नक्कीच आठवण होते, मी पणा, अहंकार अन् ‘हम करे सो कायदा’ यातून सत्याची कधीच निर्मिती होत नाही. नसबंदी करून विवाह थाटणार्या आणि बारश्याचे निमंत्रण देऊ पाहणार्यांना सत्य काय हे कधीच समजणार नाही, म्हणूनच आज मृत्युनंतरही गांधींच्या पुतळ्यावर नत्द्रष्ट पैदासी सर्रास गोळ्या घालतायत. पहिला अतिरेकी म्हणून ज्या नत्थुरामकडे पाहिलं जातं त्या नत्थुरामचे गोडवे गातायत, जय जयकार करतायत, गांधींच्या कापडी पुतळ्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडवून आसुरी आनंद घेऊ पाहणार्या तथाकथीत गांधी विरोधकांना अन् भक्तविरांना गांधींचा महिमा जागतिक पातळीवर कधीच झाकता येणार नाही. गांधी आले, की तेथे स्वच्छता आली, गांधी आले की तिथे सत्य आले, अहिंसा आली, परोपकार आला. तेव्हा लोकशाहीच्या देशात गिता कहेती है त्याग करो, कुरान हेता है यकीन करो, बायबल कहेता है प्यार करो, त्याग-विश्वास आणि प्रेम ज्या देशात आहे, ज्या देशाचा प्रत्येक नागरीक सत्यासाठी त्याग करणारा आहे, सत्यावर विश्वास करणारा आहे, सत्यावर प्रेम करणारा आहे, तो गांधींच्या तेव्हाच्या मारेकर्याला आणि आजच्या मारेकर्यांना कधीच माफ करणार नाही. गांधी गांधी आहेत, ती एक आंधी आहे, ती अहिंसेची, सत्याची आणि माणसाला माणूस म्हणून जगू देणारी….(क्रमश:)
उद्याच्या अंकात वाचा ‘तेव्हा सत्याचे प्रयोग, आता सत्तेचे प्रयोग’