देशाचे चारही स्तंभ धोक्यात -सीताराम येचुरी
परळी (धिरज जंगले)- देशामध्ये सध्या अंधाधूंदी आणि हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. चारही स्तंभ धोक्यात असून याला वाचवण्यासाठी 28 पक्षांनी आघाडी केली. येणार्या निवडणुकमध्ये हे पक्ष भाजपाच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार असून देशाला आणि संविधानाला वाचवणे ही महत्वाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन भाकपाचे राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली आहे.
परळी तालुक्यातील मोहा येथे स्वातंत्र्यसैनानी गंगाधर अप्पा बुरांडे व त्यांच्या सहकार्यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा येचुरी यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कॉ. डी.एल. कराड, कॉ. अशोक ढवळे, कॉ. उदय नारकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना सीताराम येचुरी म्हणाले की, सध्या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. देशातील चारही स्तंभ धोक्यात आहेत. सत्य लिहिल्यामुळे पत्रकारांवर कारवाई होऊ लागली आहे. काही पत्रकार जेलमध्ये आहेत. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलीय, तरुणांच्या हाताला काम नाही, गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढले, सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे अवाक्याच्या बाहेर गेलेले आहे. मोदी यांनी जे आश्वासन दिले हातेे ते आश्वासन त्यांनी पाळलेले नाहीत, देश आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही 28 पक्ष एकत्रित आलेलो आहोत. 2024 च्या निवडणकीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, भारताला जोडण्याचे काम करायचे आहे, तोडण्याचे नाही. ‘जुडेगा भारत तो जितेगा इंडिया’ असे सांगत आज कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे असले असते तर त्यांनी संविधान वाचविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असते, असेही येचुरी यांनी म्हटले. या कार्यक्रमाला मोहासह परळी तालुक्यातील अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.