गणेश सावंत –
समाजाला दिशा देण्यासाठी महाराष्ट्रातील संत-महात्म्यांनी नारदाच्या गादीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिलं अन् त्या गादीवरून समाजाचं प्रबोधन केलं. या प्रबोधनात माणसातल्या माणुसकीपासून दुर्जनातल्या दुर्जन वृत्तींपर्यंत सत्य-असत्य याची देही याची डोळा दाखवून दिलं. म्हणूनच आजही कीर्तनरुपी सेवेला अधिक महत्व आहे. आजही त्याच नारदाच्या गादीवरून अनेक संत-महात्मे समाज प्रबोधन करत आहेत. हा मात्र आजच्या या गादीवरून समाज प्रबोधनाचं महत्व सांगितलं जात असलं तरी मांडीआड बरच काही शिजलं जातं. म्हणजेच त्याकाळी जगद्गुरू संत तुकोबा-ज्ञानोबा-नामदेवांपासून थेट गाडगे बाबांपर्यंतचे संत हे निखळ आणि नितळ मनाने समाज प्रबोधन करायचे. मात्र त्याच काळी मंबाजीसारखे दक्षिणाबाज कीर्तनकारही याच गादीवर उभा राहून कीर्तनसेवा करायचे, मात्र त्या सेवेत मेव्याला अधिक महत्व दिले जायचे. आता नारदाच्या गादीपेक्षा महाराष्ट्रामध्ये
सत्ताकारणाच्या गादीला
अनन्यसाधारण महत्व प्राप्त होऊन गेला आहे. समाजप्रबोधन करणारे संत-महात्म्यांपेक्षा मंबाजीरुपी कीर्तनकार या सत्ताकारणाच्या गादीवर अधिकतेने दिसून येत आहेत. सोयीनुसार त्यांना माणसातला माणूसपण दिसतं, दुर्जनातलं दुर्जनपण दिसतं, वाईटातला वाईट तर अधिक दिसतं. राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा उमाळा तर त्यांच्याकडे इतका असतो, जोपर्यंत एखादा माणूस त्यांच्या सोबत नसतो तोपर्यंत तो साक्षात अतिरेकी असतो. मात्र जसाच तो माणूस त्यांच्या सोबत येतो तेव्हा त्या माणसाबाबत अशा मंबाजीरुपी राजकीय कीर्तनकारांना तो माणूस सत्यवादीचा देवता दिसतो. असे कित्येक उदाहरणे 2014 पासून देशात आणि राज्यात मंबाजीरुपी कीर्तनकारांनी उभ्या जगाला दाखवून दिले आहेत. आतापर्यंत वाचकांच्या लक्षातही आले असेल, असे मंबाजीरुपी कीर्तनकार देशातल्या आणि राज्यातल्या नेमक्या कुंच्या पक्षातले आहेत. आतापर्यंत स्थानीक पातळीवरच्या नेत्यांमध्ये स्वार्थ दडलेला असेल, असे महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायचे, मात्र जसाच 20 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या व्यक्तींवर महाराष्ट्रात येऊन करतात आणि थेट जेलमध्ये टाकण्याचे इशारे देतात तेच व्यक्ती जेव्हा सत्ताकारणाचं गणित जुळवण्यासाठी भाजपाच्या दावणीला येतात त्यावेळी मात्र ते स्वच्छ झालेले असतात हे महाराष्ट्राने आता पाहितले. भारतीय जनता पार्टीला
सत्तेसाठी नवाब
सातत्याने हवे आहेत, परंतु आत्ता जे नवाब मलिक अजित पवारांच्या गटात येऊन बसले आहेत ते काहीसे भाजपाला नकोयत. आम्हाला तर आश्चर्य वाटलं, ज्या नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप भाजपाने केले दाऊदच्या मांडीला मांडी लावून बसणारा नेता म्हणून मलिकांना संबोधले आज तेच मलिक व्हाया अजित पवारांच्या मार्फत भाजपाशी संलग्न होताना दिसून आले. मलिक हे सध्या वैद्यकीय जामीनावर आहेत. मग अशा वेळी एकीकडे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि दुसरीकडे देशद्रोहाचा आरोप असलेले नवाब मलिक पवारांच्या माध्यमातून भाजपाच्या सानिध्यात जातात तेव्हा विरोधकांकडून भाजपाचा समाचार घेणे क्रमप्राप्तच. तसे झालेही नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जसेच अजित पवार गटाच्या बाकड्यावर टेकले तसेच कालपरवापर्यंत आरोप करणार्यांना दाऊदच्या मांडीला मांडी लावून बसणारे चालतात का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येऊ लागला अन् इथच सत्तेसाठी सातत्याने नवाब शोधणार्या भाजपाला अडचण वाटली अन् त्यांनी
स्वच्छ करणारी
वॉशिंग मशीन बंद केली
देवेंद्र फडणविसांनी अधिवेशनात अगदी मांडीला मांडी लावून बसणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक पत्र लिहिले, नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप आहेत ते आरोप पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, सत्ता येते, सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे अटक झाली आहे, मलिक यांना कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही. त्यांना फक्त वैदद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. मलिकांसारखे लोक सत्ताधारी बाकावर आले तर महायुतीस बाधा पोहचेल,’ खरं तर हे फडणविसांनी पत्र लिहिण्यापेक्षा शेजारी बसलेल्या अजित दादांच्या कानातही सांगू शकले असते, बरं नव्हे, भ्रमणध्वनीवरून बोलूही शकले असते, मात्र हा जो पत्राचा खटाटोप आहे ना तोच खरा मंबाजींच्या कीर्तनाचा पायंडा आहे किंवा पाया आहे. एक तर आम्ही किती देशभक्त आहोत, आम्ही किती स्वच्छ आहोत, हा डांगोरा पिटवणे भाजपाचे आद्यकर्तव्य झाले आहे. तो त्याचां जन्मसिद्ध अधिकारच म्हणावा लागेल. अरे, ज्या मलिकांना तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली आज दूर लोटताय आणि स्वत:ची देशभक्ती दाखवून देताय, त्याच मलिकांच्या नेतृत्वावर तुमच्या अदृस्त नेतृत्वाने भ्रष्टाचाराचे आरोप केले, लाचखोरीचे आरोप केले, त्या अजित दादांच्या सोबत तर तुम्ही एकदा नव्हे दोनदा शपथ घेतलीय. खरं पाहिलं तर राजकारण्यांनी समाजाचं समाजप्रबोधन करताना आजमितीला राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि सरकारचं ध्येय-धोरण सांगणे क्रमप्राप्त आहे, परंतु आज महाराष्ट्रात आरक्षणापासून शेतकर्यांच्या अडचणीपर्यंतचे अनेक प्रश्न उपस्थित असताना सत्तेच्या गादीवरून
मंबाजीचं कीर्तन
सुरू ठेवणे म्हणजे याच मूळ प्रश्नांना बगल देणे होय. कोण नवाब मलिक? हा एकीकडे भाजपाकडूनच प्रश्न विचारला जात असताना आज त्याच नवाब मलिकांच्या नेतृत्वासोबत तुम्ही सरकारमध्ये आहात. अधिवेशनाचा कालखंड हा राज्याच्या विकासाबरोबर राज्यातील जनतेच्या मुलभूत गरजांना धुमारे आणणारा असतो. मात्र गेल्या दोन दिवसांच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने सत्तेच्या गादीवर नवाब मलिकांचा विषय घेऊन भाजप मंबाजीच्या रुपाने जे कीर्तन करू पाहत आहे त्यातून महाराष्ट्रातल्या मूळ विषयांना बगल देण्याचा हा प्रयत्न नक्कीच आहे. एकीकडे नैतिकेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अजित पवार गटाचे दिल्लीतील सुत्रधार प्रफुल्ल पटेल यांची गळाभेट घ्यायची, यातून सर्वकाही दिसून यायला वेळ लागत नाही. खरंतर भाजपाने सत्तेसाठी जेवढे काही खटाटोप आजपावेत केलेत ते जर समतेसाठी केले असते, तर आज महाराष्ट्रात जे आरक्षणाच्या प्रश्नावरून लोक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत ना ते ठाकलेच नसते. अधिवेशनाच्या कालखंडात कोणते विषय काढायचे आणि त्या विषयातून कुठल्या विषयाचे विषयांतर करायचे हे ध्येय धोरण आखूनच भाजप राज्याचे वाभाडे काढतय, यात दुमत असण्याचे कारण नाही. राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणाला महत्व देण्यापेक्षा भाजपाकडून सत्ताकारणाला जे महत्व दिलं जातं आणि त्या सत्ताकारणासाठी
दुर्जन-सज्जन ठरतो
हे अनेक वेळा अनेकांच्या बाबतीत भाजपामध्ये पहायला मिळालं आहे. जिथे आपली सत्ता नाही, जो आपल्य सत्ताकारणाच्या गणितामध्ये आड येतो तिथे ईडी-विडी, सीबीआय सारख्या वटवाघुळी मागे लावायच्या अन् सज्जनाला दुर्जन ठरवायचे, तोच दुर्जन भाजपाच्या दारात आला, तर वॉशिंग मशिनमधून धुवून त्याला पुन्हा सज्जन करायचे आणि आपलं सत्ताकारणाचं गणित जुळवून आणायचं, हा धंदा भाजपाचा आजचा नाही. मात्र आता मलिकांच्या माध्यमातून सत्ताकारणासाठी नवाब हवे असणार्या भाजपाला थोडीशी कोंडी झाली असली तरी भाजपाचे मंबाजीरुपी सत्ताकारणातले राजकारणी फडणविसांच्या माध्यमातून सत्तेच्या गादीवरून कीर्तन करत असे राष्ट्रभक्तीचे धडे देत राहतील. मात्र या गादीवरूनच जे कीर्तन करतात आणि त्यांच्या वाणीतून जे भाष्य निघते ते खरेच देशहिताचे आहेत का? देशभक्तीचे आहे का? त्यात राष्ट्रभक्तीला किती महत्व आहे? अन् खरं पाहिलं तर त्या कीर्तनात सत्ताकारणाचं गणित आणि भविष्य कसं आहे हे आता लोकांनी ओळखलं बरं.











