संभाजीनगर (रिपोर्टर): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत छत्रपती संभाजीनगरच्या दौर्यावर असून, यावेळी त्यांनी मराठवाड्यातील चारही ठाकरे गटाचे उमेदवार मोठ्या ताकतीने विजयी होतील असा दावा केला आहे. तसेच, बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना निवडणूक सोपी नसून, नांदेडचा आदर्श टॉवर कोसळणार असल्याचे म्हणत त्यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, मराठवाड्यात ठाकरे गटाचे 4 उमेदवार मोठ्या ताकतीने विजयी होतील. जालना आणि लातूरमध्ये बदल होईल हे खात्रीने सांगतो. नांदेडमध्ये आदर्श टॉवर कोसळून जाईल आणि पंकजा यांना देखील निवडणूक सोपी नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात 45, पण आम्ही महाविकास आघाडीचा आकडा 35 प्लस सांगतो. 20 जागाच फिक्स केल्या म्हणजे भाजपने आपला पराभव मान्य केला असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान याचवेळी संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोबत राहावं म्हणून आम्ही हात जोडले, विनवण्या केल्या. संविधान रक्षणासाठी त्यांनी सोबत यावं ही सगळ्यांची भूमिका होती. आम्ही 6 जागा देऊ केल्या होत्या. प्रकाश आंबेडकर यांचा अनेकांशी वाद आहे, त्यात आम्ही का पडावं. पण, आजही त्याच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान याचवेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर देखील टीका केली आहे. मोदींचे नाने घासून पुसून गुगुळीत झाले आहे.मोदी मोदी आता बाजारात चालत नाही. कोण चिंकन खातात आणि कोण खात नाही हा काय प्रचाराचा मुद्दा नाही. बीफ निर्यात करणार्या 5 कंपनीकडून साडेपाचशे कोटी निधी घेतला, याच उत्तर मोदी यांनी द्यावं. भ्रष्टाचाराच शेन खाण्यापेक्षा मटण खाणे चांगलं आहे. मोदी चेहरा की मुखवटा हा देश ठरवतील. लोक भूत आलं म्हणतात आणि मुलं घाबरतात या चेहर्याला, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.