
मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ही संधी, संधीचं सोनं करा
आम्ही कायदा पाळू पण गोळ्या घातल्या तरी मागे सरकणार नाही
जुन्नरकडून मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना
90 कि.मी.चा रस्ता जॅम, तासातासाला मोर्चेकर्यांची संख्या वाढतेय
बीडच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मोर्चास्थळी दुर्दैवी मृत्यू
जुन्नर (रिपोर्टर): छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे लाखो मराठ्यांसोबत कूच करत असून जरांगे यांच्या मोर्चात तासा तासाला मराठ्यांचे जत्थे जोडले जात असल्याने मोर्चाच्या रस्त्यावर किमान 70 ते 90 कि.मी.चा रस्ता जॅम पहायला मिळत आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी आम्ही सर्व कायदे-नियम पाळून आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगली संधी आली आहे, त्या संधीचं सोनं करावं, मुंबईत येण्याअगोदर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन करतानाच आम्हाला गोळ्या घातल्या तरी आता मागे सरकणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली. जरांगेंच्या या थेट भूमिकेवर सरकार अस्वस्थ झालं असून आझाद मैदानावर उपोषणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मोर्चात सहभागी झालेल्या केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश देशमुख या मोर्चेकर्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर 29 तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी घोषीत केला होता. काल 27 ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने घोडदौड करताना पहावयास मिळत आहे. रात्री उशिरा जुन्नर येथे हा मोर्चा पोहचला. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत जरांगे पाटलांनी वज्रमूठ आवळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना ही सुवर्णसंधी आहे, या संधीचे सोने करावे, रायगड, शिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या…त्यानंतर 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, अशी टीका मनोज जरांगेंनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करा, असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरुन सांगतो…देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठांच्या मागण्यांची अंमजबजावणी करा…हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, आम्ही कायद्याचं पालन करू. परंतु मोर्चेकर्यांचा अपमान केला तर तेही लक्षात ठेवू. आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे सरकणार नाही, असं म्हणत सरकारला इशारा दिला. दुसरीकडे सरकार मोर्चाच्या अनुषंगाने सावध भूमिकेत असल्याचे पहावयास मिळत असून जरांगे यांच्या सोबत आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले. तासा तासाला या मोर्चामध्ये राज्यभरातून मराठ्यांचे जत्थेचे जत्थे सामील होत असल्याने हा मोर्चा आक्राळ-विक्राळ रूप घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. काल चाळीस ते पन्नास कि.मी.चा रस्ता जॅम होत होता. आज तो 90 कि.मी.च्या पुढे रस्ता जॅम होत असल्याचे सांगण्यात येते. यावरून या मोर्चाची तीव्रता, आक्रमकता दिसून येते.

दुर्दैवी बातमी केजच्या मोर्चेकर्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काल अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला असून बीड जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने मराठा बांधव मोर्चात सहभागी आहे. केज तालुक्यातील वरपगाव येथूनही मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले. यामध्ये सतीश देशमुख हेही मोर्चामध्ये सहभागी असून जुन्नर याठिकाणी मोर्चास्थळी मुक्कामी असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार : राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे ते आंदोलन करतायेत याचे कौतुकच आहे. त्यांच्या मागण्या ते सार्थपणे मांडत आहेत. उदय सामंत यांच्याशी काल बोलणे झाले होते, उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार आहोत. समितीशी बोलून याबाबत वेळ ठरवता येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ दिलीये. पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ मान्यही केलीये…मात्र शिवनेरीत पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलं. त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली 8 तासांची वेळ पाळणार की वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अटीशर्ती काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.






