दिल्ली/परळी : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम (प्रसाद) योजनेत बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी भगवान शंकरांचे पाचवे ज्योतिर्लिंग असून देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. रेल्वे आणि विविध वाहतूक सुविधांमुळे परळी सहज पोहोचण्याजोगे तीर्थक्षेत्र असले, तरी शौचालये, पार्किंग व्यवस्था, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. त्यामुळे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर, २०१४-१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रसाद योजनेत परळी वैद्यनाथाचा समावेश करून प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परळी शहराचा एकात्मिक व नियोजित विकास करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा उभारणी, अन्न न्यायालये, पार्किंग, प्रकाशयोजना, स्वच्छता सुविधा तसेच स्थानिक समुदायासाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
परळी वैद्यनाथचा प्रसाद योजनेत समावेश झाल्यास लाखो शिवभक्तांना दर्जेदार सुविधा मिळतील, तसेच संपूर्ण बीड जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळून आर्थिक व सामाजिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने या महत्त्वाकांक्षी योजनेत परळी वैद्यनाथचा समावेश करून एकात्मिक विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशी नम्र विनंती त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.








