गणेश सावंत
मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं समर्थांनी म्हटलं. मराठी माणूस मिळवायचा असेल, महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर मराठी भाषा ही वाढली पाहिजे, जगली पाहिजे, संवर्धली पाहिजे, बोलली पाहिजे, मात्र तीच भाषा बोलली जात नाही. नमस्कार, चमत्कारची जागा हाय-हॅलो, टाटा-बायबाय, मॅजिकने घेतली. जेव्हा बोलण्यातून मराठी भाषा दुरापस्त होत असेल, तर मग ती भाषा जगेल कशी? आणि जेव्हा भाषाच जगणार नाही तेव्हा मराठा तितुका मिळेल कसा? महाराष्ट्र धर्म वाढेल कसा? हा प्रश्न आज मराठी दिनाच्या अनुषंगाने विचारावा वाटतो. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन. त्यांच्या लेखणीतून मराठीला वैचारिक तेज, सामाजिक भान आणि विद्रोहाची ताकद मिळाली. परंतु प्रश्न असा आहे, आपण त्यांच्या वारश्याचे खरे वारस आहोत का? मराठी दिनी सोशल मिडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो, शाळेत कार्यक्रम होतात, भाषणांमध्ये मराठीच्या गौरवगाथा रंगतात. परंतु दुसर्या दिवशी वास्तव वेगळे नसते का? घरात मुलांशी इंग्रजीत संवाद, दुकानाचे फलक इंग्रजीत, शासकीय कार्यालयात मराठीपेक्षा इतर भाषांना प्राधान्य ही वस्तूस्थिती नाकारता येईल का? भाषा ही संवादाचे साधन नाही, ती संस्कृतीची ओळख, इतिहासाची साक्ष आणि अस्मितेचा पाया असते. मराठी ही संतांची विचारवंतांची, क्रांतीकारकांची भाषा आहे. जगद्गुरू संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची ती वाहिनी आहे. मग तिच्या सन्मानासाठी एकच दिवस का? कुसुमाग्रजांनी

चाळीस वर्षांपूर्वी म्हटलं,
घुबडाचे व्रत्त धरू नका
पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका,
मीच विनवते हात जोडुनी, वाट वाकडी धरू नका
सूर्य कुलाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल,
काळोखाचे करून पुजन, घुबडाचे व्रत धरू नका,
अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका,
अंध प्रथांच्या कुचट कठोरी, दिवा भिता सम दडू नका
कुसुमाग्रजांच्या या कवितेतील सहा ओळींचा सार काढला तर आजच्या स्थितीवर मग ती राजकीय, सामाजिक अथवा शैक्षणिक असो तेव्हाच त्यांनी भारत मातेच्या तोंडी तुम्हा-आम्हाला अभिवादन केलं होतं. ते नक्कीच आत्मचिंतीत करावयास लावणारं. स्वातंत्र्याच्या पन्नाशीत कुसुमाग्रजांना भविष्याची जी भीती होती ती स्वातंत्र्याच्या अशठ्याहत्तरीत खरी ठरतेय. एकीकडे मराठी भाषेचा उदो उदो व्यासपीठावरून करायचं आणि दुसरीकडे मराठी भाषा संपुष्टात कशी येईल यासाठी कटकारस्थाने करत सरळ सरळ मराठी भाषेच्या शाळाच बंद करायच्या किंवा बंद पाडण्यासाठी तसे वातावरण निर्माण करायचे आणि ते वातावरण सध्या राज्यात प्रामुख्याने पहायला मिळतय.
अभिजात दर्जा नेमका कुठं?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि सत्ताधार्यांनी जल्लोष केला. शोभायात्रा, ठराव, गुलाल, जाहिराती – जणू काही मराठीचे भाग्य पालटले! आम्ही सत्तेवर होतो म्हणून हा दर्जा मिळाला, असा डंका पिटला गेला. पण दीड वर्ष उलटत आले तरी हा ‘अभिजात’ दर्जा कागदावरच का अडकून आहे? दादा भुसे यांनी विधानसभेत कबुली दिली – राज्यातील 255 मराठी शाळा बंद पडल्या. ही आकडेवारी फक्त संख्या नाही; ती संस्कृतीच्या मुळावरचा घाव आहे.
शिक्षणमंत्री सांगतात, पालकांचा कल इंग्रजीकडे आहे म्हणून शाळा बंद पडतात. मग प्रश्न सरळ आहे – मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांची मुले मराठी माध्यमात शिकतात? सत्ताधार्यांचीच मुले जर मराठी शाळांची पायरी चढत नसतील, तर सर्वसामान्यांनी का विश्वास ठेवावा?
आज ग्रामीण भागातील शाळा बंद होत आहेत. शेतकरी, शेतमजूर, आदिवासींची मुलेही कॉन्व्हेंटमध्ये जातात का? की त्यांच्या शाळांकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे? शिक्षक अतिरिक्त ठरणार, असेही विधान होते. म्हणजे मराठीचे शिक्षक उद्या बेरोजगार आणि भाषा अभिजात?
उदय सामंत म्हणतात, इंग्लंडसह विविध ठिकाणी अध्ययन उत्कृष्टता केंद्रे उभारणार. उत्तमच. पण आधी मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा पाया मजबूत करा. परदेशातील केंद्रांपेक्षा गावातील शाळेचा दिवा जास्त महत्त्वाचा नाही का? मराठी दिनी भाषणे होतात; पण वर्गात शिक्षक नाहीत. अभिजात दर्ज्याच्या घोषणा होतात; पण शाळांना कुलूप लागते. हा उत्सव आहे की उपरोध? इथं जेवढी
व्यवस्था जबाबदार तेवढेच
तुम्ही-आम्ही जबाबदार
हे सत्य स्विकारावेच लागेल. ज्या पद्धतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा अभिमान सत्ताधारी गाजवतात आणि स्वत:च्या टिर्या बडवून घेतात, मराठी शाळांकडे दुर्लक्ष करतात त्याप्रमाणे तुम्ही-आम्हीही मराठी भाषेवर बेगडे प्रेम करतो. इंग्रजी भाषा आली म्हणजे आपले पितृ स्वर्गात गेले या आवेषात इंग्रजी शाळेचं कोडकौतुक केलं जातं आणि मराठी शाळांकडे दुर्लक्ष करत पालक विद्यार्थ्यांना आईच्या दुधापासूनच वंचीत ठेवतात. मातृ भाषा म्हणजे आईचं दूध आणि इंग्रजी भाषा म्हणजे बाटलीतलं दूध. म्हणूनच आंबेडकरांनी म्हटलं ‘शिक्षण हे वाघिनीचं दूध, तो जे पेयील तू गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ त्यामुळेच आम्ही म्हणतो, आधी लेकरांना मातृत्वाचं दूध पाजा, ते पायावर उभे राहतायत तेव्हा बाटलीबंद दूध पाजलं तरी हरकत नाही.











