कटाक्ष/गणेश सावंत -9422742810
बीडकरांना सत्तासंघर्ष नवा नाही, बदल एवढाच गेली तीन दशके बीडच्या नगरपालिकेवर एकअंगी सत्ता होती. अध्यक्ष कोणीही असो क्षीरसागर म्हणतील तेच बरोबर हे अंतिम सत्य होतं. मात्र तीन दशकांची ही वृत्ती बीडकरांनी नेस्तनाबूद करत जनतेचा आवाज म्हणून बीड नगरपालिका क्षीरसागरांच्या व्यतिरिक्त लोकांच्या हातात दिली. गेल्या आठ महिन्यांच्या कालखंडामध्ये बीड शहरवासियांच्या मुलभूत गरजा पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा होती. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज यासह सर्वसामान्यांच्या कामाला गती या नव्या सत्ताधार्यांच्या कार्यकाळात मिळेल, अशी अपेक्षाही केली जात होती. मात्र बीडकरांच्या या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आणि बीडच्या नगरपालिकेत सत्तासंघर्षाचा एकप्रकारे पर्दाफाश झाला. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील मतभेद आता बंद दाराआडच्या बैंकीपुरते मर्यादीत उरले नाहीत. ते थेट व्यासपीठावर लोकांसमोर आणि लाईव्ह झाल्या आहेत. जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना शहराच्या विकासाची जबाबदारी दिली. तेच एकमेकांची उनीदुनी काढण्यात आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त अहेत. यातून हे बीड शहराचे आणि शहरवासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. नगरपालिकेच्या
विशेष बैठकीत
काल-परवा जो गोंधळ झाला त्यावरून बीडची नगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये कर्तव्यपथावर असलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक हे जनहितासाठी लढत होते की स्वहितेसाठी? हे आता उघड होत आहे. याबैठकीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद, संघर्ष हा वैयक्तिक म्हणून नक्कीच दुर्लक्षित करता येणार नाही. विकास कामाच्या निधी वाटप कामाच्या तुकडेबाजीचा आरोप, ई टेंडरचा प्रश्न आणि अधिकार्यांच्या निर्णयावर उपस्थित केलेले आक्षेप या सर्व बाबी थेट सार्वजनिक पैश्याच्या पारदर्शक वापराशी संबंधित आहेत. लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप करावेत की नाही हा त्यांचा राजकीय प्रश्न असू शकतो, परंतु त्या संघर्षाची झळ शहराच्या विकासाला बसू लागली तर तो जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनतो. म्हणूनच आम्ही आज याप्रश्नी लक्ष घातलं. आतापर्यंत दोन ते तीन वेळा ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये जे राडे आणि पोरकटपणा बीडकरांनी पाहिला तो संतापजनक. स्वत: चे ईगो, स्वत:चे महत्व, मी किती मोठा, मी काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयास इथे प्रत्येक नगरसेवक करताना दिसतो. दोन-पाच पक्ष बदलले, आमदार, खासदार, मंत्र्यांना डावलले म्हणजे कोणी मोठं होत नाही. हे नगरसेवक उभयतांनी लक्षात घ्यावे. जो
निधी जनतेचा मग ही मनमानी कोणाची?
प्रत्येक भागासाठी विकासनिधी देण्याचा ठराव झाला असेल तर त्याची अंमलबजावणी नियमानुसार आणि पारदर्शक झाली पहिजे. कामे कितीही छोटी-मोठी असोत त्यामध्ये नियमांचे पालन झाले पाहिजे. कामाच्या किमती कृत्रिमरित्या विभागून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न झाला का? हा प्रश्न उपस्थित होत असेल तर त्याची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे. कारण सरकारी निधी म्हणजे कोणत्याही पदाधिकार्याच्या खिशातील पैसा नाही. स्पष्ट भाषेत बोलायचे झाले तर बापाची जहागीर नाही. तो बीडकरांच्या करातून आणि शासनाच्या तिजोरीतून येतो. त्यामुळे एका कामाची फाईल कोणाच्या मर्जीने पुढे गेली आणि कोणाच्या अपेक्षेने थांबली यापेक्षा ती फाईल नियमाच्या चौकटीत होती की नाही? हे अधिक महत्वाचे. काल-परवाच्या लाईव्ह सभेमध्ये बीडकराच्या नगरपालिकेत
तुकडे-तुकडे गँग
होती की काय, हे स्पष्टपणे जाणवत होतं. तुकडे-तुकडे गँग म्हणजे ज्याला ज्ञान नाही, जो अज्ञानी, जो स्वत:च्या मनाला वाटेल तेच करणार. आम्ही म्हणू तेच खरे हे दाखवणार. बीडची नगरपालिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. याचं नेतृत्व गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे करीत आहेत. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांमध्ये किती गट पडले, या बॉडीचे किती तुकडे झाले हे समजायला मार्ग नाही. तुमचे गट-तट आणि तुकडे तुकडे गँग किती बनवायच्यात ते बनवा परंतू बीडच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व द्या. केवळ टेंडरमधून पैसा कमवायचा हा उद्देश जर ठेवत असाल तर बीडची जनता पुन्हा माफ करणार नाही. बीड राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे. ज्या बशीरगंजमध्ये बीड नगरपालिकेची इमारत आहे त्या बशीरगंजमध्ये बीडच्या गल्लीपासून ते अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत चर्चा करणारे आणि गल्ली ते आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करणारे लोक इथे आहेत त्यामुळे नगरपालिकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांचे तुकडे तुकडे गट काय करतात हे लोकांना नक्कीच माहित आहे.
मुख्याधिकार्यांची भूमिका
न्यायिक आणि निर्णायक असायला हवी. परंतु इथे मुख्याधिकारी बोटचेपी धोरण अवलंबत असल्याचे स्पष्ट जाणवते. मुरुमाच्या कामाला तुकडे करून टेंडर करता येते परंतु तेच अतिमहत्वाच्या पिण्याच्या पाण्यासाठी तुकडे करून टेंडर येत नाही, ही दुहेरी भूमिका खरंतर समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकार्यांनी कोणत्या नियमांच्या आधारे ते निर्णय घेतले, त्यामागे प्रशासकीय भूमिका काय होती आणि त्या निर्णयामुळे ई टेंडरींगसारखी प्रक्रिया टाळली गेली का? याची स्पष्टताही जनतेसमोर आणली पाहिजे. आज संबंधित मुख्याधिकारी रजेवर गेले, त्यांचा फोन बंद आहे. हे अत्यंत चुकीचे. कारण जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागतील. बीड नगरपालिका ही कुठल्याही गटाची मालमत्ता नाही, ती बीड शहरातल्या प्रत्येक नागरिकाची संस्था आहे हे आधी समजून घ्या.
इथे अजितदादांच्या विचाराला हरताळ
फासली जातेय. अजितदादांनी बीडची बाराती करण्याहेतू पूर्ण ताकतीने बीडची नगरपालिका ही स्वत:च्या पक्षाकडे आणली. भरघोस निधी या नगरपालिकेला देण्याचे दायित्व स्वत:कडे घेतले. बीडचे पालकत्व स्वत:कडे घेतले, बीडकरांच्या दुर्दैवाने अजितदादांचा अपघाती, अकाली मृत्यू झाला. खरंतर त्यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र पोरका झाला, परंतु त्यांच्या विचाराला अनन्यसाधारण महत्व देत त्यांचे विचार आचरणात आणण्याचे काम खरंतर व्हायला पाहिजे. दादा म्हणाले होते, 15 लाखांच्या आतमधले कुठलेही टेंडर करायचे नाही, मग इथे 10 लाखांच्या आत टेंडर झाले कसे? बरं जे झाले तर मग पुन्हा 10 लाखांचे टेंडर का होत नाहीत? हे प्रश्नच आहेत आणि याचे उत्तर उभयतांना द्यायावे लागतील. सरळ सरळ वैयक्ति स्वार्थापोटी गटेतटे करायची आणि सरळ बीडच्या विकासाला नानाची टांग मारायची हे धोरण आता चालणार नाही. अन्
राजकीय कुरघोडीत बीडकरांचा बळी
कोणी घेत असेल तर त्याला जाब विचारला जाईल. आज बीड शहरात नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था आहे, पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आहेत, कचरा व्यवस्थापन नाही, स्वच्छतेची बोंब उडाली आहे, पथदिवे अनेक ठिकाणी बंद आहेत, नागरी सुविधांची कमतरता आहे, अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेतील सत्ताधारीच जर विकासाच्या मुद्यावर एकत्र बसण्याऐवजी एकमेकांवर धावून जात असतील तर नागरिकांनी कोणाकडे पहायचे? खुर्चीसाठी भांडणारे अनेक ठिकाणी असतात पण शहरासाठी भांडणारे या नगरपालिकेत किती नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष कोणत्या गटाचा, उपनगराध्यक्ष कोणत्या गटाचा आणि कोणत्या नेत्याचे वजन कोणाच्या मागे यापेक्षा बीड शहराचा विकास कोणाच्या अजेंड्यावर आहे हा प्रश्न अधिक महत्वाचा. सत्ता हे साधन आहे आणि अंतिम ध्येय हे शहराचा विकास असला पाहिजे. कारण बीडकरांनी तमाशा नव्हे तर विकास मागितला आहे. मात्र काल बीडच्या नगरपालिकेत तुकडे तुकडे गँगचे तमाशा मंडळ होते आणि हा तमाशा उभ्या बीडकरांनी पाहिला. आता बस्स, नियमाने शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकांनी ज्या अपेक्षा ठेवून तुम्हला तिथे बसवलं त्या अपेक्षांची पूर्ती करा.








