परळी :ऑनलाईन रिपोर्टर
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राहावं, त्यांच्यामागे आम्ही उभे राहू असं महत्वाचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. त्यामध्ये फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने एकत्र आलेले मुंडे बहीण-भाऊ आता बीडच्या राजकारणातही एकत्र येणार का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
देवेद्र फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती जनतेला दिली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना त्याचा फायदा धाला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांनाच आजच्या कार्यक्रमाची उत्कंठा आहे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी असंच एकत्र राहावं, एका स्टेजवर राहावं. आमच्या तिघांची अशी ताकद तुमच्या मागे उभी करू की पळचीच काय बीडही आपलं असेल. परळी, बीडसोबत महाराष्ट्राचं कल्याण करू. हा मंच असाच राहो.
माननीय मुख्यमंत्री वैधनाठ देवस्थानचा विकास आराखडा केंद्राकडून मंजूर करून आणणार आहे. आम्ही तिघे एकत्रित आल्या नंतर आमच्या तिघांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही, आम्हाला शेजारच्या राज्यात प्रचारासाठी बोलवतात असा टोलाही त्यानी उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे ते म्हणाले शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरत केंद्र सरकारसोबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हाला दुष्काळमुक्त करायचं आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देणार आहे, असं ते म्हणाले.
महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घर दिलं जात आहे. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकास कामासाठी मी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करुन आणणार आहे, असं ते म्हणाले.आम्ही तिघं एकत्र आलो आहोत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाला लागला. आम्ही जेथे गेलो तेथे चांगला निकाल लागला. आम्ही बाहेर गेल्यामुळे आमच्यावर टीका करतात. दुसऱ्या राज्यात कशाला प्रचाराला गेला म्हणतात. तुम्हाला कोणी शेजारच्या घरी देखील बोलावतं नाही, आम्ही इतर राज्यात जातोय तर तुमच्या पोटात का दुखतंय असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
पुढच्या वेळी अजित पवार यांना देखील मी सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असं फडणवीस म्हणाले
धनंजय मुंडे फडणवीसांच्या जवळचे
त्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. धनंजय मुंडे यांनी एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकालात महत्त्वाचे 75 निर्णय घेतल्याचं सांगत त्याचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे हे माझ्या तर जवळचे आहेतच, पण देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचे आहेत.